चीनच्या संभाव्य अभद्र छायेत “चिकन नेक” ?

चीनच्या संभाव्य अभद्र छायेत “चिकन नेक” ?
भारतात पाकिस्तान तर्फे दहशतवादी कारवाया सतत चालू असतात. त्यामुळे भारताला पाक सीमेवर विशेषतः काश्मीर सेवेवर सतत सजग राहावे लागते. नुकत्याच पहलगाम हत्याकांडामुळे भारत व पाक मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. व आता युद्धविराम झाला असला तरी अद्यापही ते सावट कायम आहे. अशातच बांगलादेश चीनच्या मदतीने लालमोनीरहट विमानतळ सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चेने भारत-बांगलादेश सीमेवरही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यातही सिलीगुडी कॅरीडोर ज्याला चिकनेक असेही म्हणतात याला चीनकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिलिगुडी कॅरीडोर
सिलिगुडी हे पश्चिम बंगालच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी महानंदा नदीवरील असलेले एक शहर असून ते कलकत्त्यापासून पाचशे साठ किलोमीटर अंतरावर आहे. सिलिगुडी कॅरीडोर हा पश्चिम बंगालचा बांगलादेश व नेपाळ दरम्यानचा चिंचोळा मार्ग असून हा भाग ६० किलोमीटर लांब व २२ किलोमीटर रुंद आहे. या मार्गाची सर्वात अरुंद भागाची रुंदी केवळ 22 किलोमीटर आहे. कॅरिडोरच्या उत्तरेला भूतान आहे .या कॅरीडोर ने पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश ,आसाम , मणिपूर, मेघालय, मीझोरम, नागालँड , त्रिपुरा भारताशी जोडलेले आहेत. म्हणून या मार्गाला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात येथूनच जाणारा राजमार्ग व रेल्वे मार्ग पर्वोत्तर राज्यांना भारताशी जोडतो. या राज्यांशी दळणवळणाचा हाच एकमेव मार्ग आहे. हा संवेदनशील असल्याने याच्या रक्षणासाठी भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल, शिवाय पंजाब पोलिसांची ही गस्त असते. या मार्गाला पर्याय म्हणून म्यानमार मधून मार्ग तयार करण्याची योजना आहे या प्रस्ताविक मार्गात कलकत्ता ते म्यानमारच्या सितवे बंदरापर्यंत समुद्र मार्गे पुढे कलादान नदी द्वारे जमिनीपर्यंत व तिथून पुढे मिझोरम पर्यंत जमीन मार्ग असा हा प्रस्तावित मार्ग असून याची अद्याप केवळ चर्चा असल्याचे समजते.
चीनच्या मदतीने विमानतळाचे पुनरुज्जीवन
बांगलादेशचा चीनच्या मदतीने बांगलादेशातील सहा विमानतळ पुनर्जीवित करण्याचा मानस आहे. यात ईश्वर्धी, ठाकूरगाव , समशेरनगर ,बोगरा, कोमिल्ला ,सोबत लालमोनीरहाट विमानतळ सुरू करण्याचा बांगलादेशचा मानस आहे यासाठी चीनशी बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.
लालमोनीरहाट
हजार एकराचे वर विस्तार असलेला बांगलादेश मधील हा विमानतळ इंग्रजांनी १९३१ मध्ये निर्माण केला होता दुसऱ्या महायुद्धातही हा मित्र राष्ट्रांच्या फौजेसाठी एक महत्त्वाचा विमानतळ होता. भारत पाकच्या विभाजनानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधील हा विमानतळ काही वर्ष नागरी सेवे साठी उपयोगात होता व त्यानंतर हा बंद करण्यात आला.हा विमानतळ भारताच्या सिलीगुडी पासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे तर भारताच्याच मेघालय राज्याच्या सीमेपासून केवळ अंदाजे १५ किलोमीटरवर आहे. अन्य पाच विमानतळा सह याही विमानतळाच्या पुनर्जीवनाचा बांगलादेशचा विचार आहे व त्यासाठी बांगलादेश ने चीन पुढे प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.
बांगलादेशचे चीनला आमंत्रण
एक महिन्यापूर्वीच बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांनी चीनला भेट दिली व त्या भेटीदरम्यान त्यांनी चीनला बांगलादेशात आर्थिक विकासाच्या विस्ताराचे आमंत्रण दिले. त्यात मुख्यत्वे भारताच्या बांगलादेशच्या सीमेलगत असलेल्या सिलिगुडी या भागा जवळील भागाचा आर्थिक विस्तारासाठी समावेष आहे. यावेळी त्यांनी भारताच्या पूर्वोत्तर भागाबद्दलही वादग्रस्त विधाने केली आहेत.
भारतासाठी डोकेदुखी
चीनने स्वतःच्या सीमावर्ती भागात बहुसंख्य ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून संभाव्य युद्धकालीन परिस्थितीत जलद वाहतुकी च्या सुविधा निर्माण केल्या आहेत. चीनची कुरापती वृत्ती पाहता भारत चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते. अशा वेळेस भारताच्या सीमेवर बांगलादेशात चीनने तळ निर्माण करणे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते परवडणारे नाही.बांगलादेशच्या आमंत्रण नुसार चीनने भारताच्या भागातील चिकननेक जवळील बांगलादेशच्या सिमेलगतेच्या भागात कोणत्याही स्वरूपात आपले अस्तित्व निर्माण केले तर तेथून चीन भारताच्या हालचालीवर नजर ठेवू शकतो व ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
भालचंद्र ठोंबरे ९८३४३५०८९५