धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव सर्वात पुढे !

धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव सर्वात पुढे !
सोलापूर : संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्याने धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची जोरात चर्चा आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. सीआयडी आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणातील आरोपी आणि संबंधितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, या प्रकरणात वाल्मिक कराड यांचेच नाव पुढे येत आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे कम सांभाळत होते. त्यामुळे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते.
गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. यावरूनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणालेत. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का? याची चर्चा सुरू झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले. दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे. मंत्री मंडळात खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. मी सुद्धा मिळालेल्या विभागावर नाराज नाहीय. मी आता माझ्या वडिलांची दुष्काळ हटवायण्याची इच्छा पूर्ण करू शकेन, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.
बीडमध्ये एसआयटीच्या तपासाला वेग
संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. बसवराज तेली हे बीडमध्येच मुक्कामी आहेत. काल बसवराज तेली यांनी केज शहरात जाऊन सीआयडीच्या अधिकाऱ्याकडून संतोष देशमुख प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर रात्री आठ वाजता बीड शहरातील शहर पोलीस स्टेशन मधील सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मीक कराड याची चौकशी केली. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा बसवराज तेली हे संतोष देशमुख प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.
——————————++++