डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या त्रिशरणाच्या रक्षणासाठी संघटित होणे हेच बाबू आवळेंना खरे अभिवादन – डॉ पुरणचंद्र मेश्राम

डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या त्रिशरणाच्या रक्षणासाठी संघटित होणे हेच बाबू आवळेंना खरे अभिवादन – डॉ पुरणचंद्र मेश्राम
भाषण करताना डॉ. पुरणचंद्र मेश्राम, विचार मंचावर विनायक जामगडे, प्रा. विकास जांभुळकर, प्राचार्या रुबीना अंसारी, प्रा राष्ट्रपाल मेश्राम, प्रा. जयंत रामटेके.
नागपूर/ विशेष प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्म, संविधान व रिपब्लिकन विचारधारा हे देशाला दिलेलं नव त्रिशरण असुन ह्या त्रिशरणाचे संवर्धन व रक्षणासाठी कर्मवीर हरिदास आवळे अखेरच्या श्वासापर्यंत लढले.वर्तमान स्थितीत संघटीत होऊन डॉ आंबेडकरांनी दिलेल्या त्रिशरणाचं रक्षण करणे हिच बाबु आवळेना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी विचारक डॉ पुरणचंद्र मेश्राम यांनी केले.
कर्मवीर हरिदास आवळे बाबु प्रतिष्ठानच्या वतीने कर्मवीर आवळे यांच्या ५५ व्या स्मृतीदिनानिमित्त आंबेडकर मिशन सभागृहात ‘ कर्मवीर हरिदास आवळे यांची राजकीय दृष्टी : आंबेडकरी राजकारणाची दिशा ‘ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. परिसंवादाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन नेते व आवळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जामगडे हे होते.
डॉ. मेश्राम पुढे म्हणाले की “नाही रे ” वर्गाचे राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता असलेला आंबेडकरी समाज हा वर्तमान स्थितीत राजकीय दृष्टया एकाकी पडला असून सत्ताकारणात अस्पृश्य ठरला आहे ही आंबेडकरी राजकारणाची शोकांतिका आहे.यासंदर्भात सर्वकष चिंतनाच्या माध्यमातून व्यापक रणनीती आखण्यासाठी वंचित समुहातील समस्त बुध्दिवंत व कृतिशील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी भाषणात केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात विनायक जामगडे म्हणाले की बाबु हरिदास आवळे यांनी आयुष्यभर संवैधानिक मुल्यांच्या रक्षणासाठी विधानमंडळ, न्यायालय व आंदोलनादवारे रस्त्यावर लढा दिला.व सत्तेची अमिशं नाकारुन आंबेडकरी तत्वांशी समझोता केला नाही.असे आदर्शवत नेतृत्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विकास जांभुळकर म्हणाले की भारतीय राजकारणात ज्या वर्गाची भुमिका निर्णायक ठरत होती तो वर्ग मागील निवडणुकीत अप्रासंगिक कां ठरला यांची कारणे शोधून शोधून व ती दुर करणे ही काळाची गरज आहे.यासाठी वंचित वर्गातील बुध्दीवंतानी आंबेडकरी समाजाचं नेतृत्व हातात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक बाबु आवळे यांचे नातु अँड मयुख आवळे यांनी केले.
याप्रसंगी प्रा जयंत रामटेके यांनी संपादित केलेले ” थॅंक्यु बाबासाहेब” हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. तसेच प्रा.गिरीश आत्राम यांचे ” ईकाॅलाॅजी सोशल वर्क” व प्रा. आवेशकर्णी शेख यांच्या ” सोशल वर्क इन डिझास्टर मॅनेजमेंट ” ह्या पुस्तकांचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आभार प्रदर्शन ललेंद्र आंभुलकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.राष्टपाल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती.
—————–