6 तासाच्या पोलिस – नक्षल चकमकीत 12 माओवादी ठार
गृहमंत्र्यांकडून 51 लाखांचे बक्षीस जाहीर
गडचिरोली/E T News
छत्तीसगड सीमेजवळील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात ओंडोळी गावाजवळ बारा ते पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी १० वाजता गडचिरोली येथून पोलिसांचे एक ऑपरेशन सुरू झाले. ज्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक यतिष देशमुख (ऑपरेशन) यांच्या नेतृत्वाखाली सी-६० पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठविण्यात आले. त्यावेळी या परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सहा तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. त्यात १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.
मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली
मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम असल्याची माहिती मिळाली आहे. अन्य नक्षलवाद्यांची ओळख पटविली जाणार आहे. चकमकीनंतर परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
जखमी जवानाला हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविले
सहा तास चाललेल्या या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि सी-60 पथकातील एक जवानाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहे. त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या वडलापेठ येथे स्टील प्रकलाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे छत्तीसगड सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. त्यात गडचिरोली पोलीस दलाला खूप मोठे यश मिळाले आहे.
गृहमंत्री फडणवीस यांच्याकडून ५१ लाखांचे बक्षीस
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी आणि या मोठ्या अभियानासाठी C-60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.