Story Terror : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जळजळीत भाष्य करणारे नाटक

Story Terror : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जळजळीत भाष्य करणारे नाटक
70 व्या कामगार नाटय स्पर्धेत सादरीकरण
आजची माध्यमे एका दुष्टचक्रात सापडली आहेत. मालकांचा राजकीय विचार, त्यांचा दृष्टीकोन, त्यांचा पक्षपातीपणा आणि माध्मांवरील त्यांचा प्रभाव यामुळे माध्यमे एखादा विचार आणि सत्य त्याचे तथ्य जनतेपुढे वेगवेगळ्या पद्धतीने मांडतांना दिसतात. त्यात पुन्हा व्यायसायिक स्पर्धा हा मुद्दा वेगळा आहेच. यामुळे एकूणच माध्यमांवरील विश्वास कमी होत चालला आहे. प्रत्येक माध्यमे एकच बातमी वेगवेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतात, याच मुद्यावर काल 30 डिसेंबर 2024 ( सोमवार) रोजी ‘स्टोरी टेरर’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर करण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 70 व्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, साकोली तर्फे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राजे रघुजीनगर सभागृहात या स्पर्धेत विरेंद्र गणविर लिखित व दिग्दर्शित ‘स्टोरी टेरर’ हे दोन अंकी नाटक सादर केले. आजच्या माध्यमाच्या दर्जाविषयी आणि त्याच्या घटत्या विश्वासहर्तेवर दृष्टीक्षेप टाकणारे हे नाटक आहे. माध्यमे हे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे. सर्वांना न्याय आणि हक्कांसांठी जनतेचा आवाज उचलून धरणे, त्यासाठी लढणे ही माध्यमांची नैतिक जबाबदारी आहे. पण आज हे बहुतेक माध्यमांच्या बाबतीत होताना दिसत नाहीे. राजकीय दबावातून ही माध्यमे जनतेला वेठीस धरतात हा विषय नाटकात मांडण्यात आला आहे.
नाटकाचे दिग्दर्शन विरेंद्रने गतीशील आणि विचारपूर्वक केले आहे. काही प्रसंग साकारताना त्याने वापरलेली कल्पकता प्रशंसनीय म्हणावी लागेल. नाटकाचे नेपथ्य चांगले होते. संसद, चुनाव, पत्रकारिता सारखे काही शब्द वातावरणनिमिर्ती करणारे होते. याशिवाय सर्वच कलावंतांनी केलेला अभिनय एकदम छान होता. नाटक छानच झाले. इतर तांत्रिक बाबी नाटकाच्या जमेच्या होत्या.
नाटकात साक्षी नायगावकर, आशिष दुर्गे, ऋषिकेश पोजागे, पूजा विश्र्वेकर, कृती बनसोड आणि विशाखा साळवे, रोशन तडस, प्रणाली बनसोडे, अनिकेत मिसाळ व अन्य कलावंतांच्या भूमिका आहेत. नाटकाची प्रकाश योजना किशोर बत्तासे, पार्श्वसंगीत तनुष्क गणवीर, नेपथ्य विरेंद्र गणवीर, रंगभूषा आणि वेशभूषा अस्मिता पाटील तर रंगमंच व्यवस्था कुणाल कस्तुरे, अभिनय जपुलकर, जुहील उके यांनी पाहिली. निर्मित प्रमुख श्रेयश अतकर, उत्कर्ष तायडे आणि विशेष सहकार्य संजय शेंडे सर यांनी केले.
‘स्टोरी टेरर’ नाटकातील कथानकात पाणेरी आणि कबीर यांचा घटस्फोट झालेला आहे. ते दोघेही मुंबई येथे मोठ्या मिडिया हाऊसमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. कबीर सत्यासाठी सदैव लढतो म्हणून त्याला कंपनीतून सातत्याने त्रास दिला जातो. यामुळे त्रस्त होऊन कबीर राजीनामा देऊन स्वतंत्र पत्रकारिता करतो. त्याची पत्नी पाणेरीला पैसा – स्टेटस पाहिजे असते. म्हणून ते पुढे दोघे एकमेकांपासून विभक्त होतात. येथूनच सत्य व असत्य पत्रकारितेचे द्वंद सुरू होत जाते. मनोरमा ही पाणेरी – कबीर या दोघांच्या मधला दुवा असते. ती दोघांपेक्षा मोठी आणि सुजाण. दोघांनी परत एकत्र यावे, याकरिता धडपडत असते. प्रभाव तिवारी चॅनल मालकाचा होणारा जावई सातत्याने काड्या करणाºया स्वभावाचा असतो. यामुळे तो पाणेरीला वेळोवेळी त्रास देत असतो. तिला नेस्तनाबूत करण्याच्या नवनव्या युक्त्या रचत असतो. हे कालांतराने पाणेरीला समजते. ती ‘स्टींग ऑपरेशन’ करून मिडियाचा भांडाफोड करते. अखेर काय होते ते नाटक बघीतल्यावराच कळते.