लाडक्या बहिणींची सस्नेह परत भेट : महाविकास आघाडीच्या गळ्यात अपयशाची माळ कुणी घातली ?

लाडक्या बहिणींची सस्नेह परत भेट
महा विकास आघाडीच्या गळ्यात अपयशाची माळ कुणी घातली ?
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने ४०० पार चा दिलेला नारा आणि त्यावर काँग्रेसने ४०० चे वर जागा मिळाल्यास भाजप संविधान बदलणार अशी उठवलेली आवई ,त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर थोडाफार परिणाम होऊन बीजेपीला २४० जागा मिळाल्या तर कॉग्रेसच्या ९९ जागासह महाविकास आघाडीला ११९ जागा मिळाल्या .यामुळे काँग्रेस व आघाडीचे नेते इतके उत्तेजित झाले की बीजेपीला ४०० जागा न मिळू शकल्याने त्यांचा पराभव झाला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी करू लागले. महाविकास आघाडीला सत्ता मिळाली नाही तरी शंभरीच्या वर मिळालेल्या जागामुळे जणू आपण सत्तेतच आलो अशा प्रकारच्या एका धुंदीत आघाडीचे नेते वावरू लागले. त्यामुळे त्यांच्यात क्वचित प्रसंगी समन्वयाचा अभाव जाणवू लागला.
लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीच्या अशा प्रकारच्या फेक नेरेटिव्ह मुळे तयार झालेल्या वातावरणाचा हाच प्रभाव कायम राहिल्यास विधानसभा निवडणुकीतही युतीला जड जाणार असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थितीमुळे दडपून न जाता युती व मित्र पक्षाने महिला उन्नती व विकासा साठी योजनांचा भडीमार केला. त्यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर १) लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत २१ ते ६० वर्ष तील महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खाते जमा होणार. २) मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार ३)मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या अंतर्गत पात्र कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार, ४) मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, या अंतर्गत ७.५ अश्वशक्ती पर्यंत पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाणार,५) मुख्यमंत्री मोफत तीर्थ दर्शन योजना, या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देशातील १३९ तीर्थक्षेत्रांना मोफत प्रवास करता येणार,६) मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय कारणासाठी तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार ७) लेक लाडकी योजना, केशरी व पिवळ्या कार्डधारकांसाठी असलेल्या या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये सहा वर्ष झाल्यावर चार हजार रुपये मुलगी सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये, अकरावी ८००० रुपये आणि १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रुपये, दिले जाणार आहेत. आदी योजनांचा समावेश होता.
. यावर महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजनेवर पैसे कोठून आणणार अशा प्रकारची टीका करत असतानाच आम्ही निवडून आलो तर २१०० रुपये देऊ असे जाहीर करून आपणच या योजनेबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दर्शविले.तसेच या योजनेला प्रभावी उत्तर अथवा प्रभावी तोड शेवट पर्यंत आघाडीला सापडली नाही. या मुळेच लोकसभा निवडणुकी नंतर कमजोर वाटत असणारी युतीची बाजू सक्षम होऊन लढत बरोबरीत आली.
याच दरम्यान गणपती, देवी आदी सणांच्या प्रसंगी झालेल्या दगडफेक, मूर्ती तोडफोड, मिरवणूकीचे मार्ग अडविण्याच्या घटना, पोलिसांना मारहाणीच्या घटना, वक्फ बोर्डाचे हिंदूच्या जमीनीवरील दाव्यांच्या घटना, अमरावती मध्ये लोकसभेत राणाच्या पराभवानंतर केलेली प्रदर्शने व घोषणा, बांगलादेशातील हिंदू बांधवांवर झालेले अत्याचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा संचलनाचे प्रसंगी मुसलमानाकडून अटकाव करण्याचा झालेला प्रयत्न व देण्यात आलेल्या घोषणा आदीमुळे जनमानसात एक प्रकारची चीड तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली होती. . अशातच मुस्लिमांचा महाविकास आघाडीला पाठिंबा स्वीकारताना ऑल इंडिया मुस्लिम उलेमा बोर्डाने दिलेल्या सतरा अटी मान्य करण्यास सहमती दर्शविणारी कृती कहर करून गेली. त्यातील अटीमुळे जनमानस हळूहळू आघाडीच्या विरोधात तयार होवू लागले. त्यातूनच पुढे मोदींच्या “एक है तो सेफ है”, व योगीच्या “बटेंगे तो कटेंगे ” या एकीच्या घोषणारूपी आवाहनाचाही परिणाम सुप्त रूपात झाला, व मतांचे हळूहळू ध्रुवीकरण होऊ लागले.
उलेमा बोर्डाच्या १७ अटीत संघावर बंदी घालण्याच्या अटीचा समावेश असल्याने व एके ठिकाणी दसऱ्याच्या संघाच्या संचालना प्रसंगी झालेल्या अटकावाचा प्रयत्न यामुळे सहाजिकच संघाच्या स्वयंसेवकांनाही सक्रिय भाग घेणे आवश्यक वाटले असावे. त्यामुळे मागील निवडणुकीत साधारणता दूर असलेला संघस्वयंसेवक या दरम्यान मतदारांच्या मतदान जागृती बाबत सक्रिय होता.
जरांगेने मराठा आरक्षणाच्या मागणी साठी केलेले बहूचर्चीत आंदोलन व त्यासंदर्भात प्रथम निवडणूक लढवण्याची घोषणा व त्यानंतर अचानकपणे माघार घेण्याची घोषणा यांचाही थोडाफार परिणाम निवडणुकीवर झालाच. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण हवे अशा भूमिकेमुळे ओबीसी समाजही एकवटला असण्याची व महायूती कडे झूकला असण्याचीही शक्यता आहे.
या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन तो दि. २० नो. ला मतदानाच्या रूपात उमटला आणि या परिणामाच्या त्सुनामीत बरोबरी अथवा अटी तटीची होईल असे वाटणारी ही लढत एकतर्फी होऊन एकूण २८८ जागा पैकी महायुतीला २३०( भाजप १३२; शिंदेसेना ५७, अ.राष्ट्रवादी ४१) व आघाडीला केवळ ४६ (कॉ.१६, उबाठा २०, व श.राष्ट्रवादी १०)व ईतरांना १२ जागा देऊन महाविकास आघाडीचे पानिपत करून गेली.
महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने मागील राजकारणात दिसलेला अस्थिरतेचा भाव यापुढे न राहता महाराष्ट्राला पुढील पाच वर्षासाठी एक स्थिर सरकार मिळालेले असल्याने विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातील अशी जनतेला आशा असणे स्वाभाविक आहे.
भालचंद्र ठोंबरे
९८३४३५०८९५