मानवी आरोग्य व ध्यान साधना या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

मानवी आरोग्य व ध्यान साधना या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
‘तथागत बुद्धांनी सम्यक समाधीच्या माध्यमातून जगाला ध्यानाचा मार्ग दिला’ : सर्व वक्त्यांचा सूर
कामठी/प्रतिनिधी
२१ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक ध्यान दिनाचे औचित्य साधून व सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज व कॉलेज ऑफ सोशल वर्क, कामठी या दोन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी आरोग्य व ध्यानसाधना’ या विषयावर एकदिवसीय एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.
ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सेठ केसरीमल पोरवाल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघकाया फाऊंडेशनचे अध्यक्ष भदंत अजान प्रशील रत्न गौतम, सहजयोग फाउंडेशनच्या ध्यान प्रशिक्षक श्रीमती स्वाती इंगळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. जयंत रामटेके व डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, सहसमन्वयक डॉ. जितेंद्र तागडे मंचावर यांची उपस्थिती लाभली होती.
उद्घाटकीय भाषण करताना सुलेखाताई म्हणाल्या, योग आणि ध्यान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. मनाला एकाग्र व बळकट करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने ध्यान करणे गरजेचे आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी सम्यक समाधीच्या माध्यमातून जगाला ध्यानाचा मार्ग दाखविला. विपश्यनेचा मार्गच जगात शांतता, मैत्री आणि प्रेम प्रस्थापित करू शकतो. म्हणून प्रत्येकाने बुद्धांच्या विचारांचा स्वीकार करून विपश्यनेच्या मार्गाचा पथिक झाले पाहिजे, असे सांगून त्यांनी मेडीटेशनचे महत्त्व प्रतिपादित केले.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले, तथागत गौतम बुद्धांनी सम्यक समाधीच्या माध्यमातून विद्या व प्रज्ञा ही दोन अत्यंत महत्त्वाची मूल्ये जगाला दिली. विद्येला प्रज्ञेत रूपांतरित करण्याची किमया सम्यक समाधीत आहे. सम्यक समाधीच ध्यानाचा मूलाधार आहे. तथागत बुद्धांनीच सर्वप्रथम जगाला मेडिटेशनचा मार्ग दाखविला. दुःख हे ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. म्हणून माणसाने आपल्या दुःखाचा परिहार करण्यासाठी देवावर किंवा दैवावर विसंबून न राहता दुःखाचे मूळ शोधून आपल्या कर्माने त्या दुःखाचे क्षालन करणे गरजेचे आहे. सम्यक समाधी व विपश्यनेच्या माध्यमातून माणसाला निश्चितपणे दुःखमुक्ती मिळू शकते. ध्यान माणसात सदसदविवेक जागृत करतो. या विवेकाच्या बळावर मनुष्य सृष्टीत सर्व सुख निर्माण करू शकतो. आजच्या अराजकतेच्या परिस्थितीत मेडिटेशन हा घटक आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य मार्गदर्शक भदंत अजान प्रशील रत्न गौतम म्हणाले, ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे मेडिटेशन होय. ध्यान हे मनुष्यात मानवता घडविण्याचे कार्य करते. मेडिटेशन हा अंधश्रद्धेचा भाग नसून वैज्ञानिक तथ्यावर सिद्ध झालेला मानसिक सुसंस्काराचा जीवनमार्ग आहे. मेडिटेशन मनुष्याच्या अंत:करणाला विशुद्धतेकडे घेऊन जाते. मानवाच्या सर्व कल्याणाचा उपाय ध्यानात आहे. तणावनिवृत्तीचे सामर्थ्य निसर्गात आहे. म्हणून निसर्गाच्या सहवासात केलेले मेडिटेशन मनुष्याला शाश्वत विकासाकडे घेऊन जाते असे सांगून बौद्ध धम्मातील ध्यानाचे महत्त्व पटवून सांगितले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. विनय चव्हाण यांनी सर्व वक्त्यांच्या भाषणांचा परामर्श घेऊन मानवी जीवनात ध्यानसाधनेचे महत्त्व काय आहे या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला. उद्घाटन सत्राचे प्रस्ताविक डॉ. जयंत रामटेके यांनी केले, संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. जितेंद्र तागडे यांनी मानले.
तांत्रिक सत्रात सहजयोग फाउंडेशनच्या ध्यान प्रशिक्षक स्वाती इंगळे यांनी कुंडलिनी जागृती व ध्यानाबद्दलची विस्तृत शास्त्रीय माहिती देऊन ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी होत्या. या सत्राचे संचालन डॉक्टर सविता चिवंडे यांनी केले तर आभार डॉ. राहुल जुनगरी यांनी मानले.
समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे व डॉ. ओमप्रकाश कश्यप यांची उपस्थिती लाभली होती. प्रा.उज्ज्वला सुखदेवे व डॉ. ओमप्रकाश कश्यप यांनी विपश्यना, ध्यानसाधना, आनापानसती या घटकांवर मौलिक मार्गदर्शन केलेरॉ. या सत्राचे संचालन डॉ. जितेंद्र तागडे यांनी केले तर आभार डॉ. महेश जोगी यांनी मानले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.