साने गुरुजींच्या मौलिक जीवनावर आधारित “बलसागर भारत होवो” बुधवारी

साने गुरुजींच्या मौलिक जीवनावर आधारित “बलसागर भारत होवो” बुधवारी
नागपूर/प्रतिनिधी
मातृहृदयी साने गुरुजी भारतात सर्वांनाच माहीत आहेत, अत्यंत साधी राहणी, प्रेमळ मात्र निश्चयी वृत्ती असलेल्या साने गुरुजींनी स्वातंत्र्यापूर्वीपासूनच समाजसेवा केली. अंधश्रध्दा निर्मूलनाचा ध्यास आणि माणसा-माणसांत समानता रुजविण्याचा त्यांनी अव्याहत प्रयत्न केला. लेखन, प्रबोधन आणि कर्तृत्वाने महाराष्ट्रात त्यांनी आपला अविस्मरणीय ठसा उमटविला आहे. साने गुरुजींच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवानिमित्त भारतभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
प्रयास फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सुराणा यांनी ” बलसागर भारत होवो ‘ या दृकश्राव्य अभिवाचनाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार धीरज जोशी व ओकार गोवर्धन यांच्या भूमिका असलेल्या आणि गायिका सानिका आपटे यांच्या गायनाची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमाची संहिता डॉ. माधवी वैद्य यांची आहे.
शेखर नाईक पुणे यांच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात गणेश रंगभूमी गडकरी, स्मृती परिषद प्रतिष्ठान, सर्वोदय आश्रम व बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेने करण्याचे ठरविले आहे . बुधवार दि. १५ जाने. २०२५ रोजी सायं. ५ वा सर्वोदय आश्रम , बोले पेट्रोल पंप जवळ, अमरावती रोड नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाचा आस्वाद नागपूरकर रसिकांनी घ्यावा, असे आवाहन तिन्ही संस्थांनी केले आहे.
——————————