संस्काराच्या जाणिवेची परिपक्वता…मातृ-पितृ पूजन दिवस

संस्काराच्या जाणिवेची परिपक्वता…मातृ-पितृ पूजन दिवस
भारतीय संस्कृती फार उच्चतम संस्कृती आहे.. 14 फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ पूजन म्हणून आपल्या अंतर्मनात कोरल्या गेलेला दिवस…बालपणी आई-बाबा प्रत्येक ऐतिहासिक दिवसाचे महत्व समजावून सांगतांना कायमस्वरूपी लक्ष्यात राहील असे ज्ञानात्मक उदाहरणे द्यायचे, त्यामुळे त्या विशेष दिवसाचे संपूर्ण स्वरूप लक्ष्यात राहायचे….आयुष्याची परिपक्व समज आपली ज्ञानकक्षा विस्तारते तशीच ती आपल्या भावकोषालाही समृद्ध करीत असते….यातूनच आपल्याला आपल्या जिवलगांची पारख होत असते….आजी-आजोबा,आई-बाबांसोबतच आपल्यावर जीव ओवाळणारे भाऊ-बहीण जेव्हा आपल्याला जपतात तेव्हा खरी प्रेमाची परिभाषा आपल्याला उमजत जाते…इतकेच नव्हे तर त्यांचे वात्सल्य अलगद स्पर्शते…..
…… प्रचंड सामर्थ्य असलेल्या प्रेम* या शब्दाची आपण व्याख्याच करू शकत नाही….आजी-आजोबांचा जिव्हाळा म्हणजेच प्रेम….आई-बाबांनी आपल्या आयुष्यासाठी झिजून केलेले त्यागात्मक समर्पण म्हणजेच प्रेम*….भाऊ-बहिण, वहिनीने जीव ओतून केलेला आपला सांभाळ म्हणजेच प्रेम*……शेजारच्या काकीपासून तर शाळेतील गुरुवर्य आपल्याला जिव्हाळ्याने जपत असणे म्हणजेच प्रेम*…..आपण मोठे होत असतांना आपले सुखदुःख उमजून मैत्रिणी तयार होतात, अगदी पारदर्शक मनाच्या मैत्रिणी आपल्याशी एकरूप होतात त्यालाच तर प्रेम* म्हणतात….
…….काका-काकी, मावशी-आत्या आपल्याला कित्ती जीव लावतात…यालाच प्रेम* म्हणतात…..
…….हा प्रेमाचा प्रपंच आजन्म न संपणारा….. आपण आपल्या जीवलगांना जितके जपणार तितक्या दुप्पट आपल्याला प्रेम* मिळत राहतं…. अजूनही व्हाट्स अप माध्यमातून कितीतरी जिव्हाळ्याची जिवलग नाती आपण सांभाळतोय….या अनुभवात्मक प्रवासातून आपल्याला जपणारी (निःस्वार्थी) नाती म्हणजेच प्रेम*…..
आणि होय…..अशी प्रीतमय नाती व्यक्त करायचा स्पेशल दिवस नसतोच मुळी…… ती नाती अंतर्मनात स्वतंत्र राज्य करीत असते…. दररोज आठवणीत असते……नक्कीच आई–बाबांची काळजातील हक्काची जागा कुणीच घेऊ शकत नाही….म्हणूनच आपल्या प्रत्येक श्वासात आई–बाबा स्पर्शत असते……
……आजकाल 14फेब्रुवारी ही तारीख “प्रेमदिन” म्हणून आपल्या देशात साजरी (सोहळा स्वरूपी) होत आहे…… याला कारण आजची ठराविक (भारतीय) युवा पिढी…
त्यांचेच अनुकरण करणारी पुन्हा नव्याने तयार होत असलेली पुढली पिढी….. या पिढीला प्रेमाचा हा आठवडा फार कळायला लागला….मित्र-मैत्रिणी आणि प्रेमाची कबुली देण्याचा विशिष्ट एक दिवस…..याच भ्रमात वाढत असलेली (ठराविक उतावीळ) युवा पिढी आजूबाजूला बघायला मिळत आहे. त्यांना सामाजिक प्रश्न निर्माणच होत नाहीत….जसे हवे तसे आजवर त्यांना मिळत गेले….त्यातूनच अनुकरणप्रिय….त्याने व्हॅलेंटाईनला असे केले तर त्यापेक्षा मी प्रेमाचा अलग पराक्रम करणार…..या वृत्तीची पिढी पुढल्या नूतन पिढीला काय प्रेरणा देणार??……अशी मुले संस्कारी–सामंजस्य–जाणीव असलेल्या आदर्शवान मुलांना मूर्ख समजतात……
कदाचित प्रेम* नक्की काय? याच प्रश्नात तर ही नासमज पिढी नसेल ना??……
(अंतर्मनातील भावनात्मक जाणीव शाब्दिक ममत्वाचा आधार घेऊन पारदर्शक मनाने सहजतेने बोलणे…. म्हणजेच प्रेम*)
वृषाली वानखडे
अमरावती
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨