काँग्रेस पक्षात अंतर्गत ठिणगी लागण्याचे संकेत # अर्थकारणाच्या बळावर तिकीट मागण्याकरिता प्रयत्न
काँग्रेस पक्षात अंतर्गत ठिणगी लागण्याचे संकेत
अर्थकारणाच्या बळावर तिकीट मागण्याकरिता प्रयत्न
गडचिरोली, ता. २७ : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली आहे. मात्र ही ऊर्जा आता फार काळ टिकून राहणारी दिसत नसून काँग्रेस पक्षात अंतर्गत ठिणगी पेटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे
लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय बघता आता फक्त काँग्रेस पक्षाची तिकीट मिळाली की आमदार झालो असा समज इच्छुक उमेदवारांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे तिकीट मिळण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी गर्दी केलेली आहे. या उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत खारीचा वाटासुद्धा नव्हता. मात्र काँग्रेसला अच्छे दिन आल्यानंतर या उमेदवारांनी आपल्या अर्थकारणातून राजकारण करून तिकीट मिळवण्याचा चांगला प्रयत्न सुरू केलेला आहे. पक्षश्रेष्ठीला खुश करण्याकरिता कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू केली आहे. यात एका डॉक्टर दाम्पत्याचा अर्थकारणातून मोठे राजकारण करून काँग्रेसचे तिकीट मिळवण्याचा सर्व परीने प्रयत्न सुरू आहे. या डॉक्टर मॅडमने काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मात्र आपल्या पैशांच्या जोरावर काँग्रेस पक्षात प्रबळ दावेदारी दाखवत असल्याचे खोटे चित्र निर्माण करून काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना पैशांच्या भरोशावर आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षासोबत जुळून काँग्रेस पक्षाचे काम करत असणाऱ्या निष्ठावंत नेते मंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना देखील निवडणुकीआधीच तिकीट मिळण्याकरिता अर्थकारणातून राजकारण करावे लागत आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्याने शब्द दिला आहे त्यामुळे आपण काम करीत आहोत असा संभ्रम देखील मोठ्या प्रमाणात पसरवला जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या बॅनर मागे न राहता आपापल्या नेत्यांच्या मागे फिरताना दिसत आहे. या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून ठेवण्याकरिता आता या मंडळींना बरेच पैसे खर्च करावे लागत आहेत. काँग्रेस पक्षाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात अर्थकारण आल्याचे राजकीय विश्लेषक तथा सामाजिक नेतेमंडळींकडून बोलले जात आहे. याआधी देखील एका डॉक्टर मॅडमची एन्ट्री या पक्षात झाली होती. मात्र या डॉक्टर मॅडम काँग्रेस पक्षात फारशा टिकू शकल्या नाहीत. त्यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश करून मोठ्या पैशाची उधळण करून स्वतः करिता तिकीट खेचून आणली होती. मात्र निवडणुकीत त्यांचा सपशेल पराभव झाला. या डॉक्टर मॅडम राजकारणात तसेच जनतेसमोर फार काळ टिकू शकल्या नाही. जनतेने या डॉक्टर मॅडमला नापसंत केले. त्यानंतर शांत झालेल्या या मॅडम लोकसभा निवडणूक येताच अर्थकारणातून राजकारण करण्याचे प्रयत्न करू लागल्या. मात्र यावेळेस काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिली. डाॅक्टर मॅडमला दिली नाही. लोकसभेची तिकीट दिली नाही म्हणून या डॉक्टर मॅडम काँग्रेसचा हात सोडत भाजपात गेल्या. मात्र या मॅडम आता कोणत्याही राजकारणात सक्रिय नसल्याच्या दिसून येत आहे. डॉक्टर मॅडमला तिकीट न देता निष्ठावंत कार्यकर्त्यांना काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. मात्र आता काँग्रेसला पुन्हा एका नवीन डॉक्टर मॅडमचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात चांगलीच रस्सीखेच दिसून येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते विखुरलेल्या अवस्थेत दिसत आहेत डॉक्टर मॅडमने कोट्यवधी रुपयाचा खर्च केल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र पैशाने राजकारण होते, असे गृहीत धरणाऱ्याला याआधी देखील जनतेने धडा शिकवलेला आहे त्यामुळे काँग्रेस आता अर्थकारणातून राजकारण करणाऱ्याला तिकीट देते की काँग्रेस पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व जुळून राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदारांचे शब्द लक्षात ठेवा…
डॉक्टर लोकांनी आपले डॉक्टरचे काम करून जनतेची सेवा करावी. त्यांनी राजकारणात लुडबुड करू नये, असे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत राजकारणाचा लळा लागलेल्या जिल्ह्यातील डॉक्टर लोकांवर हल्लाबोल करत म्हटले होते. जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या प्रचंड असून डॉक्टरांची कमतरता आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरिता डॉक्टरांनी सहयोग करणे गरजेचे आहे. मात्र डॉक्टरकी सोडून राजकारणातून समाजकारण करण्याचा नवाच फंडा अनेक डॉक्टरांनी अवलंबला आहे. हे धोरण फार चुकीचे आहे, असे मत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी व्यक्त केले होते. डाॅक्टरांची अशी कानउघाडणी करणारे खासदार डाॅ. किरसान डाॅक्टर उमेदवारासाठी खरेच काम करणार काय, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
———————————————–