सोयाबीन भिजले,कपासी झोपली,संत्रा अर्धा-अधिक जमिनीवर*ॲड. यशोमती ठाकूर यांचेकडून पाहणी;तात्काळ मदतीची मागणी
सोयाबीन भिजले,कपासी झोपली,संत्रा अर्धा-अधिक जमिनीवर
*ॲड. यशोमती ठाकूर यांचेकडून पाहणी;तात्काळ मदतीची मागणी
अमरावती – शनिवारी जिल्ह्यात बरसून गेलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या, सोसाट्याच्या वाऱ्यासह धो-धो बरसलेल्या पावसात उभे कपाशी पीक झोपून शेतात आडवे पडले आहेत. संत्रा पिकालाही याचा मोठा फटका बसला असून अर्धा अधिक संत्रा गळून खराब झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या आकस्मिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून हाती आलेले पीक वाया गेल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ भरीव आर्थिक मदतीची मागणी माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली.
तिवसा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पिकांची पाहणी करताना शेतात आडवे पडलेले कपाशी पीक बघून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे असल्याने त्यांना मदत पुरविण्यात आचारसंहितेची आडकाठी आणल्या जाऊ नये हि अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, घरांची पडझड, मोझरी येथे झालेला वीज पडून मृत्यू इत्यादी नुकसानीची मदत तात्काळ द्यावी हि मागणी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.