मंत्रिमंडळ विस्तार… ऐसी भी क्या नाराजगी है ।

मंत्रिमंडळ विस्तारानंतर…
ऐसी भी क्या नाराजगी है ।
मंत्रिमंडळाचा विस्तार होवून महिना लोटला आहे.मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर देखील ज्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देण्यात आला..त्यांची नाराजी उफाळून तर आलीच परंतु या नाराजीचे कवित्व संपता संपेना..डच्चू दिलेल्या नेत्यांची दररोज प्रतिक्रिया समोर येत आहे..नुकतेच अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत जात, धर्म आणला जातो असं म्हणत आपली नाराजी व्यक्त करून दाखवली.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक नेत्यांना मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. त्यातील काही नेत्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली. काहींनी शपथविधीला गैरहजर रहात थेट नागपूरातून आपले घर गाठले. तर काहींनी अधिवेशनाला अनुपस्थिती दर्शवली. येत्या काही दिवसांत ही नाराजी थेट समोर येणार आहे. त्यात विजय शिवतारे, छगन भुजबळ सारख्या नेत्यांनी थेट प्रसारमाध्यमांना आपल्या मनातील खदखद बोलूनही दाखवली.मुनगंटीवार, अब्दुल सत्तार यांनी आपली नाराजी व्यक्त करत एक प्रकारे पक्षालाच आव्हान देत आहे.
शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना वगळण्यात आले. शपथविधीत सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटात दिसला. छगन भुजबळ (अजित पवार गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार (भाजप), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर (शिंदे गट), तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) या बारा नेत्यांना यावेळच्या मंत्रीमंडळातून डावलण्यात आले आहे.
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधे छगन भुजबळ यांची भेट घेतली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी प्रतिक्रिया देत छगन भुजबळ अधिवेशन सोडून तातडीने नाशिकसाठी रवाना झाले.आता निर्णय माझे कार्यकर्तेच घेतील,असे सूतोवाच करत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
मंत्रिमंडळातून वगळल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज झाले. विधीमंडळाच्या कामकाजाला ते अनुपस्थित राहिले. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्याला मंत्रिपदाबद्दल सांगितलं होतं, अस म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी अचानक काय झालं माहित नाही, असा मनातील प्रश्न एका मिडिया हाऊसशी बोलताना व्यक्त केला.
शपथविधी सुरु असताना शिवसेनेचे नेते तानाजी सावंत राजभवनाकडे फिरकले देखील नव्हते. सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले. सर्व आमदारा नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले. तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे.
अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढणार नसल्याची घोषणा करून निवडणुकीत जातीय राजकारण केल्या जात असल्याची खंत व्यक्त केली.
निवडणुकीत जात, धर्म आणला जातो असं म्हणते जे काही सुरु आहे, कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही अशी स्थित आहे तसंच ते भविष्यासाठी घातक आहे असं म्हणत एक मोठी घोषणा केली आहे.अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रिपद मिळालं नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या ठिकाणी संजय शिरसाटांना संधी देण्यात आली. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही रंगल्याचं दिसून आलं.
नाराजांची पक्षात राहणं अपरिहार्यता :मंत्रिपद न मिळाल्यामुळं महायुतीतील नेते नाराज आहेत. ते नाराज नेते कोणती भूमिका घेणार? किंवा अन्य पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. तर अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यानंतर या नाराजांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. किंवा त्यांना पक्ष संघटनेसाठी मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जातंय. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि महायुतीची राज्यातील ताकद आणि वर्चस्व असल्यामुळं हे नाराज नेते अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारतील असं काही चिन्ह दिसत नाही. कारण महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेची सध्या झालेली वाताहात लक्षात घेता शिंदेंच्या शिवसेनेतील नाराज नेते ठाकरेंच्या शिवसेनेत स्वगृही परततील असं वाटत नाही. हेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आहे. त्यामुळे पक्षाकडून अडीच वर्षानंतर संधी मिळेल, याची वाट पाहणे किंवा पक्षाकडून कुठली मोठी जबाबदारी मिळतेय का, किंवा महामंडळावरती संधी मिळणे ही वाट पाहण्याशिवाय नाराजांना गत्यंतर नसल्याचं तज्ज्ञ आणि जाणकारांनी म्हटलं आहे. एकूणच काय तर नाराजांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार अशी त्यांची अवस्था आहे. परिणामी नाराजांना पक्षात राहणं ही सध्या अपरिहार्यता असल्याचं चित्र दिसतंय.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६