प्रेरणादायी सावित्रीबाई

प्रेरणादायी सावित्रीबाई
ज्या काळात स्त्रीला समाजात सन्मानाचे स्थान मिळत नव्हते,शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून तिला लांब ठेऊन परावलंबी, परतंत्र ठेवले जात होते ऐन त्याच काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही, स्त्री ही फक्त चूल-मुलं सांभाळून फक्त पुरुषांवर अवलंबून राहणारी भारतीय नारी, असाच पगडा सम्पूर्ण आपल्या समाजावर ठासलेला होता.
3 जानेवारी 1831 हाच दिवस खरे तर कन्या सन्मानाचा परमेश्वराने सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेला असावा, त्याच दिवशी प्रेरणादायी, स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली बुद्धिमानसावित्री जन्माला आली. म्हणूनच तर आज भारतीय कन्या सर्वच क्षेत्रात उच्च सर्वोत्तम यशशिखर गाठतांना बघायला मिळत आहे. सावित्रीबाईबद्दल अभ्यासात्मक वास्तव बहुतेक सर्वांनी वाचलेले आहेत, खंडोजी नेवसे पाटील यांची लाडकी कन्या फक्त एका महात्म्याची निव्वळ पत्नी नव्हत्या तर ज्योतिबांचा उजवा हात राहून त्यांच्याप्रमाणे जिद्दी, करारी समाजाबद्दल कळवळा असणाऱ्या,वैचारिक जाणीवतेने वागणाऱ्या एक श्रेष्ठ युगश्री होत्या. प्रत्येक स्त्रींच्या प्रतिष्ठेची जाणीव ठेवून असामान्य धैर्याने समाजाच्या प्रखर विरोधाला सतत तोंड देत होत्या. स्वतः च्या वडिलांनीच महात्मा ज्योतिबांना शिक्षणाबाबत विरोध केलाय तर तिथे त्यांच्या अर्धांगिनींची काय स्थिती असेल? पण ज्योतिबांना कोणत्याही परिस्थितीत मुलींसाठी शाळा काढायचे होते म्हणूनच तर सावित्रीची त्यांना कणखर साथ मिळाली आणि सावित्री शेतात कामे करतांना ज्योतिबांच्या मदतीने काळ्या मातीत अक्षरे गिरवू लागली. त्यातूनच एका सरकारी शाळेत त्यांना प्रवेश मिळाला आणि पुढील शिक्षण त्या चिकाटीने घेत राहिल्यात.
14 जानेवारी 1848 ज्योतिबांनी पुण्यास स्वपरिश्रमांनी काढलेल्या मुलींच्या शाळेवर कुठलाही शिक्षक पुढे येईना, मुलींना शिकवणे म्हणजे महापाप ठरवल्या जायचे, पण पतीच्या पावलांवर पाऊल ठेऊन मुलींना शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली आणि तिथूनच पुण्यातील अतिकर्मठ लोकांनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. पण दगळफेक असो की चिखल,शेणफेक रोजचेच छळ त्यांनी जीवावर बेतून चालत राहिल्यात,आणि मुलींना जिद्दीने शिक्षण देत राहिल्यात. त्यातूनच त्यांच्या अनेक शाळा उदयास आल्यात, नंतर पुणे येथील या कर्तुत्ववान दाम्पत्याचे शैक्षणिक कार्य बघून 1852 मध्ये इंग्रज सरकारने त्यांना मेजर कॅण्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले. भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेतील या प्रेरणादायी आपल्या माननीय शिक्षिका म्हणजेच सावित्रीबाई.
सावित्रीबाई केवळ शिक्षिकाच नव्हत्या तर शिक्षक तज्ञही होत्या,शूद्रातिशूद्र मुलींच्या शाळेत त्यांच्या सोबत फातिमा शेख या पण शिक्षिका होत्या. वर्गातील चाचणीचा सरासरी निकाल बघता शिक्षणाच्या प्रगतीला परंपरा आणि परिस्थिती हीच कारणीभूत ठरत आहे हे त्यांनी अभ्यासून अतिशूद्र ,शूद्र मुलांचा खरा विकास होण्यासाठी समाजातील शिक्षकांची नियुक्ती केली, त्यातच प्रौढ शिक्षणाचा विचार करून अगदी तळमळीने रात्रीचे वर्ग चालू केलेत. त्यातच वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून समाजजागृती करून एक अध्यापक विद्यालय सुद्धा सुरू केले होते. त्या काळी बालिका विवाह, त्यांच्यावर अतिरेक, कन्या विधवा, तिचा विचित्र छळ, विधवांचे गरोदरपण, त्यांच्या आत्महत्या, भ्रूणहत्या हे सारे सवित्रीबाई बघून फार तळमळत होत्या.,सावित्रीबाईंना या सर्व घातक रूढींना आळा घालायचा होता, पण केवढे उदात्त कार्य होते हे स्त्री यातना शेवटी भरगच्च वात्सल्यता असलेल्या माऊलीलाच कळली, आणि ज्योतिबांचे विचार घेऊन त्यांनी पुढे पाऊल टाकले ते योग्यच होते. कित्येकदा हे लोकसेवेचे व्रत करतांना स्वतःचा हुंदका त्या घ्यायच्या आणि अखंड ज्योतिबांना साथ द्यायच्या. प्रत्येक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक विधवा त्यांच्या लेकी झाल्यात.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर विरोधकांची पर्वा न करता ज्योतिबांना अनेक ठिकाणाहून व्याख्याने करायला बोलावणे येऊ लागलीत त्यात सावित्रीबाईंनी त्यांना नित्य साथ दिली,
आयुष्याच्या संध्याकाळी या दाम्पत्यांचे कार्य उत्साहाने अविरतपणे चालू होते,त्याचवेळी मांडवी येथे 11 में1888 रोजी सर्व विचारशील जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना “महात्मा” ही पदवी आदराने दिली.
ईश्वर एक असून तो सर्वव्यापी,निर्गुण व सत्यरुप आहे. कोणताही व्यक्ती हा मनुष्यजातीने श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या गुणाने श्रेष्ठ ठरतो, हीच त्यांची शिकवण.
सावित्रीबाई आणि ज्योतिबांना स्वतःची अपत्य जरी नव्हती पण तरी त्यांनी यशवंतला दत्तक घेऊन फार जीव लावला होता,त्याचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करणे सावित्रीबाईंचे ध्येय होते. न खचता साथ देणाऱ्या महात्म्याची त्या अर्धांगिनीच नव्हत्या तर समाजातील दीन-दलितांना आधार देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या सहचारिणी होत्या. त्यातच ज्योतिबांचा आजार, मुलगा यशवंतची डॉ होण्याची स्वप्ने, लक्ष्मीचा सांभाळ,समाज चळवळ,हे प्रश्न सावित्रीबाई समोर येऊ लागले, शेवटी मृत्यू अटळ आहे हेच खरे, आणि महात्मा ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्या सुन्न झाल्यात. पण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्या वेदनेत लेकरांप्रमाणे साथ दिली, कारण जोडीदार कायमचा दूर झालेला, आणि उर्वरित काटेरी वाट एकटीने तुडवायची होती, अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे एकटीने पेलवून पुढे कसे जायचे? पण त्यांच्या समाजकार्यात अनेक हाथ पुढे येऊन धैर्याने त्यांच्या पाठीशी उभे राहत गेले, जोडीदार गेल्यावर अनेक कार्य अधुरी पूर्णत्वास न्यायची होती.ज्योतिबांना त्यांनी जे वचन दिले होते ते सत्यशोधक समाजाच्या कार्यात व्यक्तिगत दुःख बाजूला ठेऊन कार्य करीत राहील, सावित्रीबाई आपल्या साधी राहणीतून,रसाळ वाणीतून सत्यशोधक समाजाच्या परिषदेत सर्व जनतेला मार्गदर्शन करीत राहिल्या. याप्रमाणे सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी नीट पार पाडलीत. ज्योतिबांची ठिकठिकाणी झालेली संभाषणे सावित्रीबाईंनी काळजीपूर्वक संकलन करून ठेवलीत. पण त्यांच्या काळजातली काव्य मात्र कमजोर झालेले होते,त्या एक प्रगल्भ रचना लिहिणाऱ्या कवयित्री होत्या. एक विज्ञानरुपी विचार करणाऱ्या माणिनी होत्या. सावित्रीबाई आणि महात्माज्योतिबा यांना अभिप्रेत असलेले स्त्री स्वातंत्र्याचे आणि स्त्री–पुरुष समानतेचे स्वप्न भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीत अजूनही अपुरे आहे.
म्हणूनच सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्व आणि कार्य हे पुढील शतकातही प्रत्येकांसाठी आदर्श ठरणारच… सहजीवनाचा यशस्वी प्रवास म्हणावा लागेल या दाम्पत्याचा.
वादळाला होती वादळाची साथ…. सावित्रीने घडविली शैक्षणिक वाट…
वृषाली वानखडे✍🏻
अमरावती✨✨🚩