२ ठार, २८ प्रवासी जखमी – गाईला वाचवण्याच्या नादात महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात
२ ठार, २८ प्रवासी जखमी – गाईला वाचवण्याच्या नादात महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात
नांदगाव पेठ/अमरावती
गाईला वाचविण्याच्या नादात नागपूरवरून अकोलाकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील रिलायन्स पेट्रोलपंप समोर घडली. घटनेत दोन जण ठार झाले असून २८ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून यावेळी अनेकांचे प्राण वाचवले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर अकोला शिवशाही बस क्र. एम.एच.०९,इ.एम.१७७८ नागपूर वरून अमरावती येत असतांना सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप समोर दुभाजकावरून अचानक गाईने उडी मारल्याने तिला वाचवण्याच्या नादात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस पलटी झाली. यामध्ये ३५ प्रवासी होते त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले तर २८ प्रवासी जखमी झालेत.
मृतकांमध्ये पंचफुला रामकृष्ण कांबळे (७५) रा. राजुरा, चांदूरबाजार, आदित्य लीलाधर इंगळे (२३) रा. नागपूर यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये रामराव आप्पा सावंत (६५) रा. तिवसा, मीरा माणिकराव कडूकर रा. अचलपूर,माणिक मारोतराव कडुकार (६५) बेगमपुरा अचलपूर, सिद्धार्थ रामकृष्ण कांबळे (५६) राजुरा चांदूरबाजार, चंद्रकलाबाई श्रावणाजी चौरे खोलापुरी गेट अमरावती, सिंधू भारत लांडगे (४६) रा. तिवसा, वीणा संतोष बनसोड (४८), रा. शिवनगर नागपूर, अनिकेत संतोष बनसोड (२२), रा. शिवनगर नागपूर, प्रतिभा कांबळे, माणिक मारोतराव कडूकर (६५) बेगमपुरा अचलपूर, शैला शैलेंद्र मेश्राम (६०) रा. परतवाडा, कृष्णा दिनेश पटेल(२१) रा. तिवसा, दिनेश प्रल्हादराव वरघट (चालक) कौलखेड अकोला (४५), राधेश्याम प्रकाश साबळे (चालक) (३१) कानशिवनी अकोला,आशा विनोद खडसे वय (३८), आशा श्रीधर मेश्राम (६०) नागपूर, प्रतिभा सांगळे आदींचा समावेश आहे.
यामध्ये एक तरुणी चक्क बस खाली दबली होती. आयआरबीला पाचारण करूनसुद्धा क्रेनची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे माजी जि.प. सदस्य विनोद डांगे यांनी त्यांच्याकडे असलेले जेसीबी तातडीने घटनास्थळी आणले व बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचविले. घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी गंभीर परिस्थितीला हाताळून तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
आयआरबी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
महामार्गावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय महामार्ग केवळ नावालाच उरलेला आहे. जनावरे रस्त्याच्या कडेला वावर करतात आणि त्यामुळे असे अनेक अपघात याठिकाणी घडतात. आयआरबी कडे क्रेन किंवा जेसीबी कधीही उपलब्ध नसतो. मोठी यंत्रणा असून सुद्धा अपघाताच्या वेळी ती कमी पडत नसेल तर अश्या संस्थेवर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. रविवारी झालेल्या घटनेला आयआरबी प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
नितीन हटवार, प्रत्यक्षदर्शी, माजी जि. प. सदस्य नांदगाव पेठ
महामार्गावरील मोकाट जनावरांना कोण आवर घालणार
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रविवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा टोल वाहनधारकांकडून वसूल करणारी आयआरबी मात्र सुविधांच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. महामार्गावर असंख्य मोकाट जनावरे फिरतात मात्र त्यांचा कोणताही बंदोबस्त करण्यात न आल्याने हा अपघात घडला. या प्रकाराला नेमकं कोण आवर घालणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
————-