महाराष्ट्राच्या लोकशाहीची दिवाळी साजरी करू या !
महाराष्ट्राच्या लोकशाहीची दिवाळी साजरी करू या !
भारतीय भूभागात प्रगतीशील आणि आर्थीक सक्षम राज्य महाराष्ट्र समजल्या जाते. संत-महापुरूषांच्या जन्माने पुनीत असलेला महाराष्ट्र धनधान्याने ,खनीज संपत्तीने, वनसंपदेने आणि जलसंपदेने समृध्द असल्याचा पुरातन इतीहास आम्ही कितपत जपतो आहोत याच चिंतन होने गरजेचे आहे.
शिक्षणाचे भांडार सर्व जाती-धर्मांना मोडत, गरीबाच्या झोपडीत पोहचाव म्हणून, छत्रपती शाहु महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानात, शाळेसोबतच आरक्षण आणि वस्तीगृहे निर्माण करून, रयतेला शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. खरा रयतेच्या राजाने महात्मा ज्योतीबा फुले आणि सावीत्री आईच्या शिक्षणाच्या कार्याला लोकहीताचा करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय संविधान निर्मीती करतांना,गौतम बुध्द,संत कबीर आणि वारकरी संतांनी दिलेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारीत समतामूलक संविधान निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्माला घालणारी ही महाराष्ट्रभूमी. पुस्तकी ज्ञान शिकवीणाऱ्या विद्यापीठात कधी न गेलेला समतेचा जागर करणाऱ्या संत गाडगे बाबांचा महाराष्ट्र, राष्ट्रभक्तीचा जागर करीत राष्ट्रधर्म ही नव्या धर्माची संकल्पना मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या लोकशाहीची दिवाळी साजरी करण्याची वेळ आज महाराष्ट्राच्या सुज्ञ नागरिकांवर आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका लेखातून खऱ्या लोकशाहीचा विचार मांडतांना ते लिहतात-
” स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करण्यासाठी, लोकशाहीला सफल व यशस्वी बनवीण्यासाठी खेड्याखेड्यांतील जनतेला तिच्या हक्कांची व कर्तव्याची जाणीव लोकभाषेतून करून देण्याचे कार्य प्रत्येक जाणत्या व्यक्तीने आज केले पाहीजे. तरच राष्ट्राचे भवितव्य उज्जवल होणार आहे. “
मित्रांनो राष्ट्रसंतांच्या या लिखानाला आज ७५ वर्ष झाले. सर्वच धर्माची धार्मीक स्थळे वाढली. कीर्तन, प्रवचन, प्रबोधन वाढले. दूरदर्शनवर रोज प्रबोधनाच्या मालीका उद्बोधन करतात. धन, संपत्ती हे सर्व मायाजाळ सांगणारे सर्वच धर्माचे पंडीत यांचे राहणीमान फाईवस्टार झाले आहे. मूठभरांच्या श्रीमंतीला धनसंपत्ती ठेवायला जागा नाही. पण या महाराष्ट्राचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांच्या आत्महत्या थांबत नाही. काही अनकष्टी शेतकऱ्यांची टींगलटवाळी करतांना, ‘ यांना भीक मागायची सवय आहे ‘ असे टोमणे मारतात. कारण या टोमणे मारणाऱ्यांना सहज पैशाची प्राप्ती होते. सहज अनेक सोयी सवलती उपलब्ध होतात.
शेतकऱ्यांच्या अन्नधान्यांचे भाव, कांद्याचे भाव, भाजीपाल्याचे भाव वाढले की अनेकांच्या पोटात दुःखत त्यावर जोरात चर्चा घडते. पण खाद्यतेलाचे भाव, मिठाईचे भाव, कपड्याचे भाव, घरबांधकाम सामुग्रीचे वाढले तर फुसके फटाके फुटत असतात. कोणत्या राजकीय पक्षाने महाराष्ट्रावर राज्य कराव याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीच देणेघेणे नसते. रोजच्या जनजीवनात त्याला जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा सहज त्याच्या येणाऱ्या मिळकतीत भागवल्या जाव्यात हीच त्यांची अपेक्षा असते. पोरांच शिक्षण आणि आरोग्याच बाजारीकरण थांबवीण्याची धमक ज्यांच्यात आहे. असे पुढारी लोकांना हवे आहेत. भ्रष्टाचार मुक्त शासकीय व्यवस्था लोकांना हवी आहे.
धार्मीक स्थळांना मदत करा, जाती-पोटजातीचे सभागृह बांधून द्या ? ही मागणी करणारी मूठभर माणस मानवी समूहाच्या कल्यानाचा विचार करणारे कार्यकर्ते नसतात. अशा सामाजीक ठेकेदारांच्या बह्यकाव्यात येऊन लोकशाहीच्या मालकांनी आपल्या मताचा दुरूपयोग करू नये.
आज बेरोजगारीचा प्रश्न आहे हे सत्य आहे. शिक्षित तरूण हातात डीग्री घेऊन शासकीय नोकरीची भीक मागत आहे. अथवा मोठ्या कंपन्यांनमध्ये त्याला नोकरी हवी आहे. अशा नोकऱ्यांमध्ये स्पर्धा मोठ्याप्रमाणात वाढल्या आहे. पण दुसरीकडे शेतीसारख्या उद्योगाला, त्यात काम करणाऱ्याला सामाजिक सन्मान नसल्यामुळे तेथे रोजगार असून कामाला माणस मिळत नाहीत. छोट्या व्यवसायात काम करायला शिक्षीत तरूणांना लाज वाटते,कमीणाच वाटते. मजूरांच्या त्रासामुळे अनेक व्यवसाय बंद पडत आहे. विद्वान यावर नेहमी आपले तर्कवितर्क देतात. पण आज प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या लोकशाहीची दिवाळी, तुम्ही आम्ही कशी साजरी करावी यासाठी आपली वैचारीकमुल्य तपासण्याची आहे. आमच्या निवडूका ह्या जातीपातीच्या आणि धर्माच्या जोखडात अडकत आहे. निवडणूकांवर भांडवलशाहीचा प्रभाव वाढत आहे. आम्ही सत्तर -ऐंशीच्या दशकातील निवडणुका अनुभवल्यात. नेते-पुढारी मोजकेच होते, कार्येकर्ते मोठ्याप्रमाणात असायचे. नेता तोच असायचा ज्याला सामाजिक भान आहे. लोकसमस्येचा अभ्यास आहे. अशी माणस पैशांनी आणि कपड्यांनी फाटकी असली तरी लोकांचा त्यांना पाठींबा असायचा. लोकच निवडणुकांमध्ये आपलाच ब्रश, आपलाच चूना घेऊन भीती रंगवायचे. अमक्याला मतदान करा याचा प्रचार करायचे. सामुदायिक कच्चाचीवडा कार्यकर्त्यांची भूक भागवायचा. कार्यकर्त्याच्या घरचा काळा चहा नेत्याला चालायचा. त्या काळात निवडणुका जाती-धर्मात कधी अडकल्या नाहीत.हळू, हळू भारतीय लोकशाहीच भांडवलदारांची गुलाम होत चालली.
नवीन पिढीतील तरूणांनी भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा अभ्यास करावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सत्तर वर्षाआधी भारतीय लोकशाही बदल लिहतात-
” परंतु शेकडो वर्षे गुलामगिरीत घालवल्यामुळे जनता आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकारांना पार विसरून गेली आहे. राष्ट्रीय बुध्दी, दूरदृष्टीस पारखी झाली आहे. त्यामुळे तत्कालिक व क्षुल्लक अशा व्यक्तिगत स्वार्थाला बळी पडून ती आपल्या हाताने आत्मनाशच करून घेत आहे. तिला आपल्या अधिकारावर आरूढ करून देणे, हेच सुराज्याचे बीज आहे. त्याशिवाय लोकशाही स्वराज्याचे वैभव जनतेला अनुभवता येणार नाही. “
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोकशाहीवर पोवाडा लिहतांना म्हणतात-
” बहू मोलाचे हे मतदान, सोडुनी भान,देऊ नका दारू पिणाऱ्यासी।
लाचखाऊ चोर बाजाऱ्याशी । अन्यायी गुंड दंडेल्यासी ।
कराल देशाची सत्यानाशी हो s ऽ जी ॥
धुंदीत जाऊनि कुणी, मते देऊनी। पश्चातापास पात्र होणार ।
करू नका तसा कुणी व्यवहार । असो मग प्रजा किंवा सरकार ।
कानी घ्या तुकड्याची पुकार ! हो s s जी ॥
तुमचे मत बहुमोलाचे आहे. लाच खाणारे भ्रष्टाचारी उमेदवारांना निवडून देऊ नका. पण, आज सत्तप्रवृत्तीचा माणूस निवडणुकांच्या बाजारात उभाच होऊ शकत नाही, याचे कारण आम्ही आहोत. मतदारांनी जर आपले कर्तव्य योग्यरितीने पार पाडले तर मवाली, गुंड राजकारणात येतीलच कशाला ? राष्ट्रसंत एका लेखात लिहतात-
” आपल्या सर्वांची सामुदायिक इच्छाशक्ती म्हणजेच सरकार, आपण जशी इच्छा करू, तशीच सत्ता साकार होणार ! राष्ट्रीय सत्तेला ‘घर की मूर्गी…..’ समजून जे लोक तिचा गैरफायदा घेत असतील ; त्यांच्याऐवजी नीतिमान तिमान, त्यागी, मानवधर्मी, उज्जवल, चारित्र्यवान व निर्भीड अशा जनसेवकांना पुढे आणून राष्ट्राचे बरे करणे जनतेच्या हाती आहे. विघातक टीका न करता, जनतेला याची पूर्ण जाणीव करून देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, तरच सुराज्याचा झेंडा गरिबांच्या झोपडीवर लागेल. ! “
मतदारराजा, उठ, जागा हो; जात, धर्म, पंथ, पक्ष यांना दूर सारून सद्विवेकबुध्दीने मतदान कर. आपला हक्क बजाव, त्यातच तुझे आणि देशाचे कल्याण आहे.
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
9823966282