गणपती बाप्पा सुबुद्धी दे !
गणपती बाप्पा सुबुद्धी दे !
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या श्रीगणेशोत्सव साजरा केला जातो आहे. संपूर्ण तरूणाई यात गुंतलेली आहे.लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक श्रीगणेश उत्सव हा कश्यासाठी सुरू केला ? याचे भान तरूणाईला असल्याचे जाणवत नाही. जो तो आमदार, खासदार, व्यापारी, उद्योजक इ. च्या जीवावर वसुली करून श्रीगणेश उत्सव मोठया प्रमाणावर साजरा करतो आहे. काही ठिकाणी तर वर्गणी करीता जबरदस्ती केली जात आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.या कारणाने सध्या तर कुणीही लोकप्रतिनिधी कुणालाही दुखवू इच्छित नाहीत. कारण याचा मतांवर परिणाम होऊ शकतो याची भिती मनात असते.ही सुवर्णसंधी श्रीगणेश मंडळांना लाभलेली आहे.जो तो यात आपला हात साफ करून घेऊ इच्छितो आहे. परंतु लोकप्रतिनिधी हे काही दुधखुळे नाहीत.आपले कोण तुपले कोण हे ओळखण्यात ते सराईत राजकारणी झाले आहेत.तरीही फुलं नाही तर फुलांची पाकळी ही त्यांना द्यावीच लागते आहे.
श्रीगणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आहे. सगळी तरूणाई ही यात दंग झालेली असते. लोकमान्यांनी देश जागृतीस्तव श्रीगणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप बहाल केले होते.आजही खरेतर याची गरज आहे.परंतु श्रीगणेशोत्सवाचे आज व्यापारीकरण केले गेले आहे.जवळपास सगळ्याच हिंदूंच्या उत्सवावर जाहिरातदारांनी कब्जा केलेला आहे.यामाध्यमातून ते आपल्या वस्तूंची,मालाची, प्रतिष्ठानाची जाहिरात करू इच्छितात. यामुळे
श्रीगणेशोत्सवाचे खरे रूप बदलले आहे. लोकांमध्ये जनजागृती करून चांगल्या गोष्टींची सुरूवात करण्यासाठी याचा वापर होने अपेक्षित आहे.आज आपणं वाईट सवयींचे गुलाम झालो आहोत.सिने अभिनेते हे तरूणाईला आदर्शवत वाटत असल्याने ते त्यांच्या चुकीच्या गोष्टींचे पणं समर्थन करतात. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची प्रथा अजूनही आपल्यात बाळसे धरू शकलेली नाही. याचे कारण चांगले आणि वाईट कश्याला समजावे हेच तरूणाईला कळेनासे झाले आहे.याची जाणीव लहानपणापासूनच घरातून आणि शाळेतून करून द्यायला हवी आहे.आम्ही चुकीच्या गोष्टींना महत्त्व देतो आहे.जसे- मेहनत करून पैसे कमविणे हे बुध्दीचातुर्याचे लक्षणं मानले जात नाही.तर कमी श्रमात लोकांना उल्लू बनवून बक्कळ पैसा कमविणे हे बुद्धीचातुर्याचे लक्षणं मानले जाते आहे.असे आपले संस्कार रूढ केले जातात आहेत.यात भर म्हणून की काय रेवडी छाप योजनांचा निवडून येण्यासाठी बाजार मांडला जातो आहे.जनतेला पणं याचे आकर्षण राहिलेले आहे. आमची बुध्दी ही अशी चालते आहे.यामुळे देशावरील,राज्यांवरील कर्जाचा बोजा हा वाढतोच आहे.हा भार जनतेवर लादला जातो आहे.बोर देऊन आवळा काढण्यात राज्यकर्ते मंडळी प्रवीण झालेली आहेत.खरे तर जनतेला याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. परंतु असे होतांना दिसून येत नाही.हीच जनतेची गुलामीची मानसिकता राजकारणी लोकांना सोयीची वाटते आहे.गणराया आमच्या राज्यकर्त्यांना आणि जनतेला देशाची भलाई कश्यात आहे याची जाणीव होण्यासाठी सुबुध्दी दे !
श्रीगणेश मंडळांनी देशात,राज्यात चालणा-या चांगल्या वाईट घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी वादविवाद स्पर्धेचे,व्याख्यानाचे, किर्तनाचे मोठ्याप्रमाणावर आयोजन केले पाहिजे.वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठीच्या प्रयोगांचे कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजेत.देशातील शैक्षणिक,सांस्कृतिक, आर्थिक,आरोग्य विषयक इ.धोरणांवर चर्चा झाली पाहिजे. इतर देशांतील शैक्षणिक,आरोग्य, व्यापार, शेती,परराष्ट्र,न्याय इत्यादी चांगल्या वाईट गोष्टींचा उहापोह चर्चेतून केला गेला पाहिजे. सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींच्या विचारांची मांडणी जनतेसमोर करून यातून चांगला संदेश देता आला पाहिजे. वाईट गोष्टींकडे बोट दाखवितांना चार बोटे ही आपल्याकडेच वळलेली असतात याचे भान ठेवून वागायला हवे.डीजेच्या कर्णकर्कश आवाजामध्ये कुठले सुमधूर संगीत दडलेले असते हे अजून पर्यंत कळलेले नाही.धार्मिक कार्यक्रमांमध्ये सनईचा, मंगल वाद्यांचा आवाज हा दुर्मिळ होत चाललेला आहे.यामुळे निर्माण होणारी वातावरण निर्मिती ही कानाला सुखावणारी नसते.आनंददायी नसते. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी नसते. डीजेच्या आवाजाने आणि लेझर लाईटच्या प्रकाशाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.यावर सरकारने बंदी ही घातलेली आहे. तरीही कायद्याचे पालन न करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही इमानेइतबारे बजावत असतो. डीजेवरील गाण्यांमधून समाजप्रबोधन किंवा सकारात्मक ऊर्जेची निर्मिती ही होत नसते.तर यात ठासून नकारात्मकता ही भरलेली असते.यातून तरूणाईच्या नको त्या भावना चाळवल्या जातात. यातून चुकीच्या कृत्यांना समर्थन मिळत असते.याचे भान आयोजकांनी,मंडळांनी ठेवायचे असते.यातून समाजाची रूची कश्यात आहे हे लक्षात येते आहे.
काही मंडळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि स्पर्धेचे आयोजन करीत असतात.यातून जिंकणा-या स्पर्धकांना प्रमाणपत्र,रोख बक्षिसे, ट्राफी देऊन सन्मानित केले जाते.यासाठी आप आपल्या क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना, मंत्र्यांना आमंत्रित केले जाते. यामुळे श्रीगणेशोत्सवाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.ही अत्यंत गंभीर बाब ठरते आहे.धार्मिक कार्यक्रमात राजकारण आल्याने गणेशोत्सवाकडे प्रबोधनाचे एक माध्यम म्हणून पाहिले जात नाही. यामुळे गणेशोत्सवाचे महत्त्व डागाळले गेले आहे. याचा विचार सुज्ञ मंडळींनी करायला पाहिजे. श्रीगणेशाच्या मुर्तीच्या उंचीवरून चालणारी स्पर्धा ही निषेधार्ह आहे.यामुळे श्रीगणेश विसर्जनाला गालबोट लागते आहे.मुर्तीची विटंबना होत आहे. भाविकांच्या भावनेशी खेळले जात आहे.तसेच मुर्ती स्थापना आणि विसर्जन करतांना काही कार्यकर्ते हे मद्यधुंद अवस्थेत पहायला मिळतात.तसेच लावण्यात येणारी गाणे ही बिभस्य,अस्लील, द्विअर्थी स्वरूपाची असतात.याबाबत राज्य सरकारने सांस्कृतिक नियमन कायदा पास करायला हवा.होणा-या कार्यक्रमांवर संपूर्ण निगरानी असली पाहिजे.जेणेकरून गैरकृत्याला कुठलाही वाव मिळणार नाही.कार्यक्रम हा प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक असला पाहिजे. तरच गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले जाईल असे वाटते.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा. जिल्हा – चंद्रपूर मो. क्र. 9511215200