बलुचिस्तानात पुन्हा संघर्ष भडकणार ? ७५ वर्षापासून स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष
बलुचिस्तानात पुन्हा संघर्ष भडकणार ? ७५ वर्षापासून आपल्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष
स्थापनेपासून केवळ सात महिन्यातच स्वातंत्र्य गमावलेला बलुचिस्तान गेल्या ७५ वर्षापासून आपल्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष करीत आहे. त्यामुळे या भागात कायमच असंतोष धूमसत असतो. गेल्याच आठवड्यात बलुचिस्तानच्या तुर्बन भागातील पाकीस्तानच्या सैन्य ठिकाणावर केलेल्या एका आत्मघात की हल्ल्यात १३० जवान ठार केल्याचा दावा बलूचिस्तान लिब्रेशन फ्रंट ने केला आहे तर आता चिनी नागरिकांनी बलूचिस्थान सोडून जावे अन्यथा दिसल्यास ठार करण्याची धमकी दिल्याचेही ऐकीवात आहे.
भौगोलिक स्थिती
मूळचा एकसंघ असलेला बलुचिस्तान आता इराण अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यात विभागला गेला असून मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तर काही भाग इराण व अफगाणिस्तान मध्ये विभागला आहे. सद्यस्थितीतील बलुचिस्तान हा पाकचा पश्चिम भागअसून त्याच्या पश्चिमेला इराण, उत्तरपश्चिमेला अफगाणिस्तान, उत्तर पूर्वेला खैबर पख्खतून, पूर्वेला पाकिस्तानातील पंजाब, दक्षिण पूर्वेला सिंध प्रांत, तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे. बलुचिस्तान हा पाकचा क्षेत्रफळने सर्वात मोठा पण कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे.याचे क्षेत्रफळ अंदाजे १३४०५१ चौरस मैल असून बहुसंख्य लोकसंख्या बलोच आहे. त्यानंतर पश्तुन, ब्राहुई, हजारास, सिंधी, पंजाबी, मिर्री आहेत. येथे मुख्यत्वे बालोची, उर्दू ,पश्तो व ब्राहूई भाषा बोलली जाते.
बलुचिस्तान मधून पाकिस्तानला प्राकृतिक गॅस व तेल मिळते तसेच बलुचिस्तान मध्ये कोळसा सोने तांबे युरेनियम आदी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बरीचशी मदत होते. मात्र यातून बलूचिस्तान ला कहीही मिळत नाही. धान्या मध्ये गहू तांदूळ ज्वारी ही प्रमुख पिके आहेत. मात्र तरीही या भागात पूरेशा प्रमाणात वाहतूक वीज पाणी यांच्या सुविधा नसल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. येथील लोक बकऱ्या व मेंढी पालन हा व्यवसाय करतात. येथे मिळणारी उलन उच्च प्रतीची असून तीची काही प्रमाणात निर्यातही होते बलूचिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर बंदर पाकनी चीनला विकसित करण्यासाठी दिलेले आहे. याच बलुचिस्तान मध्ये चगाई येथे पाकिस्तानचे परमाणु परीक्षण स्थळ आहे.
पूर्व पिठीका
स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीच्या ब्रिटिश भारतात एकूण ५६० संस्थाने होती. भारताच्या फाळणीपूर्वी बलूचीस्थानचे ठिकाणी कलात, मकरान, खरान, लासबुल्ला ही संस्थाने होती. यात कलात या संस्थानाशी इंग्रजांनी १८७६ मध्ये केलेल्या करारानुसार कलातला आंतरिक स्वतंत्रता दिली होती. म्हणजे कोणात विलीन व्हावयाचे अथवा स्वतंत्र राहायचे हे ठरविण्याचा अधिकार कलातला होता. इंग्रजांनी कलातला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता. चार ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन, कलातचे खान मीर अहमद खान, बॅरिस्टर जिना, व जवाहरलाल नेहरू यांची दिल्लीत एक बैठक झाली, कलातची बाजू मांडण्याची वकीली जिना यांनी केली. पाच ऑगस्टला कलातला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय बैठकीत झाला. मात्र मकरान, खरान, लासबुल्ला यांना कलात मध्ये विलीन होण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मुस्लिम लीग कलातला एका स्वतंत्र राज्याच्या रूपात मान्यता देईल व त्याचा सन्मान करेल असाही एक ठराव कलात व मुस्लिम लीग मधे झाला. ११ऑगस्टला कलात स्वतंत्र झाले.व १५ ऑगस्ट १९४७ ला कलातने आपला स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
ऑक्टोबर ४७ मध्ये कलात च्या खानने पाकिस्तानला भेट दिली त्यावेळेस तेथील बलूच जनतेने त्याचे राजेशाही स्वागत केले. मात्र जिन्नाने खानला कलातला पाक मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला. खानने ही बाबत स्पष्टपणे फेटाळली. एवढेच नव्हे तर जनतेचाही या संभाव्य विलयाला विरोध होता. तेव्हा जीन्नाने १८ मार्च १९४८ रोजी खरान लासबुल व मकरान यांना कलात पासून वेगळे केल्याची घोषणा केली व २७ मार्च १९४८ रोजी कलात वर हल्ला करून खान कडून जबरदस्तीने विलीनकरणाच्या करारावर सह्या घेतल्या. अशा प्रकारे पाकीस्तानने विश्वासघाताने बलुचिस्तान बळकावला.
बलुच विद्रोह व संघर्ष
या जबरदस्तीच्या विलीनकरणा विरुद्ध बलुचिस्तान मध्ये पाक विरुद्ध असंतोष उफाळला व गेल्या ७५ वर्षांपासून याविरुद्ध बलुचिस्तान सतत संघर्ष करीत आहे. कलातच्या खांनचे बंधू अब्दुल करीम यांनी बंडाचे निशाण उभारले त्यांना कैद करण्यात आले. १९५८ मध्ये झालावनचे नबाब नौरोज खान यांनी पाकच्या धोरणाविरुद्ध लढा दिला. मात्र त्यांचेवर देशद्रोहाचा आरोप लावून कैदेत टाकण्यात आले. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला. १९६० मध्ये शेख मुहम्मद बीजराणी मर्री यांचे नेतृत्वात मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. मात्र ६९ मध्ये तो दडपण्यात आला. ७३ मध्ये पाक शासनाने बलूचिस्तान चे प्रांतीय सरकार बरखास्त करून मार्शल ला लागू केला. त्यामुळे सशस्त्र विद्रोह सुरू झाला. मीर जाफरखान यांनी बलुच पिपल लिबरेशन फ्रंट ची स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या मर्री व मेंगल आदिवासींनी संघर्ष केला. हा शमवण्यासाठी इराणच्या मदतीने त्या भागात बाॅम्ब वर्षाव करण्यात आला. त्यात अंदाजे सात ते आठ हजार बलुच आंदोलक व नागरिक मरण पावले, तर जवळपास ३००० चे आसपास पाक सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बंडावर काबू मिळविण्यात आला. २००५ साली नबाब अकबर खान बुग्ती व मीर बालाच मुर्री यांचे नेतृत्वात बलूचिस्तानला अधिक स्वायत्तता मिळावी व येथील सैन्यतळ हटविण्याच्या मागणीसाठी संघर्ष करण्यात आला. अकबर खान बुग्ती हे बलोचचे मोठे नेते असून पाकच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तसेच बलुचचे भूतपूर्व गव्हर्नर ही राहिले होते. मात्र त्यांना ठार करण्यात आले. तेव्हापासून आज तगायत अनेक विरोधी नेते व आंदोलन करणाऱ्या व्यक्ती बेपत्ता आहेत. पाक शासनाने त्यांना पकडून त्यांची हत्या केल्याचा आरोप बलूच जनतेचा आहे.
दरम्यान पाकिस्तानी ग्वादर बंदर विकसित करण्यासाठी चीनने भरपूर गुंतवणूक केली व त्या विकासाची कामेअद्यापही सुरू आहेत. या विकासाच्या निमित्ताने चिनी तंत्रज्ञ व कामगार या भागात येऊन राहू लागले. चिनने या बंदरातून मासेमाऱ्यांना हाकलून दिले. याचाही बलून जनतेवर परिणाम झाला त्यांचा या सर्व बाबीला विरोध आहे. या परकीयांच्या येण्यामुळे आपण आपल्याच भागात अल्पसंख्यांक होऊ ही भीती त्यांना अस्वस्थ करते. जमीन आपली परंतू फायदा इतरांचा हे बलुचला मान्य नाही.त्यामुळे सतत असंतोष खदखदत असतो.(यातूनच काही वर्षांपूर्वी उदभवलेल्या उद्रेकात तीन चीनी अभयंत्यांची हत्या झाली होती.)त्यामुळे बलूचियन लिबरेशन आर्मी ने चिनी नागरिकांना नव्वद दिवसात पाक सोडून जाण्याचेअन्यथा मृत्यूला सामोरे जाण्याचे फर्मान काढले आहे.त्या साठी बीएलएने एक संघटनही स्थापन केले आहे.बलूच विद्रोह मोडून काढण्यासाठी पाक सैन्याने मध्यंतरी आजम-ए -ईत्तेखाम नावाचे ऑपरेशन चालविले होते, परंतु त्यामुळे बलुच विद्रोह अधिकच भडकला व सैन्यावरील हल्ल्याची तीव्रता वाढली यातूनच गेल्या आठ दिवसापूर्वी तुर्बत भागात सैन्याच्या एका छावणीवर हल्ला करून १३० सैनिक ठार केल्याचा दावा बीएलएफने केला आहे. या हल्ल्यात बीएलए, बलूच लिबरेशन फ्रंट,तहरीक ए तालिबान आदी संघटना एकत्रित सहकार्य करीत असल्याचा दावा आहे.
साहजिकच पाक सरकार चिनी पाहूण्यांच्या रक्षणाची जबाबदारी शिरावर घेणार व त्यातून पून्हा एकदा बलूच विद्रोही व पाक सेनेत संघर्षाचा भडका उडणार याची चिन्हे दिसत आहेत.
भालचंद्र ठोंबरे ८३४३५०८९५
(या लेखातील सदोष मजकुराला लेखक जबाबदार राहतील)