अभ्यासाचे सातत्य व संयम ठेवला तर स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते : ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या ‘कॉलेज कट्ट्या’वर अमर बागडे यांचे प्रतिपादन

अभ्यासाचे सातत्य व संयम ठेवला तर स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते !
ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या ‘कॉलेज कट्ट्या’वर अमर बागडे यांचे प्रतिपादन
नागपूर/विशेष प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील सेवाप्रवेशासाठी कठोर परिश्रम करुन स्पर्धा परीक्षेचे पर्वतारोहण करावे लागते. पूर्वनियोजन, अभ्यासाचे वेळापत्रक, सातत्य व संयम ठेवल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अमर बागडे यांनी केले.
दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने “कॉलेज कट्टा – मुक्त संवाद” अंतर्गत “करिअर कट्टा” या अभिनव उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंदनसिंह रोटेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. विचार मंचावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अमर बागडे, प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम व आयक्युएसी समन्वयक प्रा. कल्पना मुकुंदे व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. व्यंकटी नागरगोजे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना मुख्य मार्गदर्शक अमर बागडे यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगातील वेगवेगळ्या विभागातील संधी, अभ्यासाचे सूत्र, सातत्य व तंत्र उदाहरणासहित अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थी सातत्य, संयम व कौशल्याने स्पर्धेला सामोरे गेले तर हमखास यश मिळते, असे सोदाहरण समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी “कॉलेज कट्टा” उपक्रमाची संकल्पना, स्वरूप व महत्त्व विषद केले. तसेच अमर बागडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. अमर बागडे हे दक्षिण-मध्य रेल्वेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत 400 हून अधिक गरीब, गरजू, व वंचित समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून शासनाच्या वेगवेगळ्या विभागात भरती होण्यास मार्गदर्शन केल्याचे आवर्जून सांगितले. अमर बागडे हे खऱ्या अर्थाने आयडियल असून दीपस्तंभासारखे व्रतस्तपणे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांनी आजच्या युगात या संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे असे आवाहन प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले.
संचालन व आभार प्रदर्शन डॉ. व्यंकटी नागरगोजे यांनी केले तर संविधान प्रस्ताविकेचे वाचन बीएसडब्ल्यू ची विद्यार्थिनी कु. जयश्री इरपाते यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.