दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात 20 जानेवारीला धरणे आंदोलन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात 20 जानेवारीला धरणे आंदोलन
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलन
चंंद्रपूूर/ विशेष प्रतिनिधी
दिल्ली येथे सातत्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असून तातडीने या सर्व मागण्यांबाबत मा. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्री यांनी निर्णय घ्यावा आणि शेेतकरी आंदोलकांच्या किमान आधारभूत किंमतीसह अन्य मागण्या मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष दिनांक 20 जानेवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे.
देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सतत सुरू असून केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील सर्व शेतमालाचे भाव पडले आहेत. केंद्र व राज्य सरकारांकडे किमान आधारभूत किंमतीने ( एमएसपीने ) संपूर्ण शेतमाल खरेदी करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नवी पिढी शेतीतून बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना काळात केवळ शेतीनेच शेती क्षेत्राचा जीडीपी ( सकल राष्ट्रीय उत्पन्न ) कायम ठेवून शेतकऱ्यांनी देश वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीही केंद्र सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत उदासीन आहे, किंबहूना शेतक-यांच्या मागण्यांना दुय्यम स्थान देत आहे.
केंद्र सरकारच्या या अडेलतट्टू धोरणाचा निषेध करण्यासाठी व केंद्राने तात्काळ दिल्ली येथील शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी व तेथील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 4 या वेळात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले जाणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, शे.सं. जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, प्रा. सतीश मोहितकर, प्रा.जोत्स्ना मोहितकर, पोर्णिमा निरंजने, ॲड.शरद कारेकर, सुधीर सातपुते, ॲड.प्रफुल्ल आस्वले, सुनील बावणे, शब्बीर जागीरदार, देविदास वारे, ॲड.दीपक चटप, शेषराव बोंडे, ॲड.श्रीनिवास मुसळे, रामकृष्ण सांगळे, सुदाम राठोड, प्रभाकर ढवस, रवी गोखरे, प्रसाद राव, गणेश कदम, विलास पायपरे, प्रा.रामभाऊ पारखी यांचेसह जिल्हा पदाधिका-यांनी केले आहे.