वनकर्मचाऱ्यांची रंगली मांसाहारी पार्टी : होणार कारवाई
वनकर्मचाऱ्यांची रंगली मांसाहारी पार्टी : होणार कारवाई
वनविभागाच्या काष्ठ आगार परीसरातील घटना
गडचिरोली, ता. २९ : वनात साधी विडी पेटवणारी व्यक्ती दिसली, तरी त्याला दंडूक्याचा मार देत वनगुन्हे नोंदविणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी वनकायद्याचा बडगा उगारणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी चक्क वनविश्रामगृहाच्या काही अंतरावर वनविभागाच्या काष्ठ आगाराच्या परीसरात चिकन, मटणची झकास पार्टी झोडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. एरवी सामान्य नागरिकांना वननियम सांगणारे वनाधिकारी व वनकर्मचारी कसे वागू शकतात, याचाही प्रत्यय या घटनेतून आला असून जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवार २९ सप्टेंबर रोजी एका वनाधिकाऱ्याला पदोन्नती मिळल्याचा आनंद साजरा करण्यासाठी जवळपास ३० हून अधिक वनकर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या लाकडाच्या डेपो परीसरातच चिकन, मटणची सामिष पार्टी केली. विशेष म्हणजे या पार्टीत गडचिरोलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे व अनेक वनाधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते. खरेतर वनविभागाच्या विश्रामगृहाच्या परीसरात मांसाहार करता येत नाही. तुम्ही वनविभागाच्या कोणत्याची वनविश्रामगृहात गेलात तर हा नियम वनविभागाकडून आवर्जून सांगण्यात येतो. मग येथील वनविश्रामगृहापासून हाकेच्या अंतरावर मांसाहारावर ताव मारणारे वनाधिकारी, वनकर्मचाऱ्यांना या नियमाची आठवण आली नाही का ? की वनविभागाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत, वनाधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नाहीत काय? असे प्रश्नही विचारले जात आहेत. दुसरे म्हणजे वनविभागाच्या या लाकडाच्या डेपोमध्ये सुकलेली लाकडे मोठ्या संख्येने आहेत. आता परतीच्या पावसानेही निरोप घेतला असून कडक उन्हामुळे येथील गवत सुकून गेले आहे. अशा स्थितीत येथे कोंबडे, बकरे शिजवण्यासाठी आग पेटवण्यात आली. या आगीमुळे गवत जळून आजुबाजूची लाकडे पेटून आगारात आग लागली असती, तर केवढा मोठा अनर्थ होऊ शकत होता, याचा साधा विचारही या पार्टीप्रेमी वनाधिकारी, वनकर्मचाऱ्यांच्या मनात नाही आला. येथे सकाळी, संध्याकाळी फिरण्यासाठी नागरिक येत असतात. अशा ठिकाणी मांसाहारी पार्ट्या करणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय मांसाहार आणि मद्याची मैत्री असून येथेही काहीजण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करणे, पार्टी करणे चुकीचे नाही. पण वनविभागाच्या शासकीय जागेत अशी मांसाहारी पार्टी कशी काय आयोजित केली जाऊ शकते, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. एरवी कोणत्याही विकासकामात वनकायद्याचा खोडा घालणाऱ्या वनविभागाला अशा मांसाहारी पार्ट्या झोडताना सगळे नियम कसे धाब्यावर बसवता येतात. त्यातही गंभीर बाब म्हणजे यासंदर्भात वनाधिकाऱ्यांना विचारणा केली असता आपण काहीच चुकीचे केले नाही, कोणताही पश्चाताप नाही, अशी निगरगट्ट भाषेत ते बोलत होते. आधीच जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. कधी वाघ, तर कधी रानटी हत्तींचा हैदोस सुरूच असतो. पण या गंभीर समस्यांकडे कानाडोळा करून वनाधिकारी, वनकर्मचारी कोंबड्या, बकऱ्यांवर ताव मारण्यात व्यस्त दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच रोषास पात्र झालेल्या वनविभागाची प्रतिमा अधिकच मलिन होताना दिसत आहे.
“आमच्या एका वनाधिकाऱ्याची पदोन्नती झाली. त्यासाठी वनविभागाच्या लाकूड डेपो परीसरात पार्टी ठेवली होती. ३० हून अधिक वनाधिकारी, वनकर्मचारी उपस्थित होते. यात काही चुकीचे केले असे वाटत नाही.”
– अविनाश भडांगे, वनपरीक्षेत्र अधिकारी, काष्ठ आगार, वनविभाग, गडचिरोली
“या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन चुकीचे झाले असल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल.”
– मिलिशदत्त शर्मा, उपवनसंरक्षक, वनविभाग, गडचिरोली
——————————