‘ त्या ‘ 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू : तिघांनाही निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी

‘ त्या ‘ 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू : तिघांनाही निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण
नागपूर/विशेष प्रतिनिधी पोलीस कोठडीत अमानुष मारहाणीमुळेच परभणी येथील विधी पदवीधर विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असा आरोप करीत याप्रकरणी मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे, तुरनर आणि बोरधान या तीनही पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. अन्यथा आपण स्वतः परभणीत जाऊन आंदोलन करू, असा इशाराही अंधारे यांनी यावेळी दिला.
परभणी येथील दंगल सदृश्य परिस्थिती ही निर्माण करण्यात आली. कुठलेही नुकसान किंवा तोडफोडीचे समर्थन करणार नाही, पण ती वेळ कुणी आणली याची चौकशी व्हायलाच पाहिजे. याबाबतीत फुटेजेस उपलब्ध आहेत. आंबेडकरी चळवळीच्या लोकांना, एका महिलेशी जाणीवपूर्वक गैरवर्तन करण्यात आले. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी ना विरोधी पक्षनेतेपद, ना लक्षवेधी न प्रश्नोत्तरे अशांमध्ये देवा भाऊ, अशा गंभीर प्रश्नांना न्याय कोण देणार,असा सवाल उपस्थित केला. परभणीतील घटनेनंतर बंद पुकारण्यात आला त्याच दिवशी भाजपने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार संदर्भात मोर्चाचे आवाहन केले होते. जाणीवपूर्वक निळे दुपट्टे गळ्यात घालून गोंधळ निर्माण करण्यात आला. केवळ याप्रकरणी विशिष्ट लोकांवर गुन्हे दाखल करीत चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही अंधारे यांनी सांगितले.
पोलीस अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न सोमनाथ सूर्यवंशी या विधी विद्यार्थ्यांच्या अंमलट आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण आलो असे सांगितले. मग तातडीने या अधिकाऱ्यांना निलंबित करा, कोंबींगच्या नावावर पोलिस तरुणांचे आयुष्य उदध्वस्त करीत आहेत. मंत्रीपदासाठी एकमेकांच्या शह काटशहाच्या नादात परभणी अशांत करण्याचा प्रयत्न झाला. त्या सर्व दोषींवर कारवाई करा, शिकणाऱ्या मुलांना आयुष्यातून उठवू नका, एकीकडे मंत्रीपदाची शपथ घेताना आकसभावाने वागणार नाही असे बोलतात, मग हा कुठला आकसभाव, असाही सवाल केला. दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यामागे मराठा – ओबीसी वाद, राजकारणाचा ते बळी ठरले असावेत, अशी शंका व्यक्त करतानाच कदाचित अजितदादा त्यांचे राज्यसभेवर पुनर्वसन करणार असतील, असा टोला लगावला.