भारत – कुवैत सहकार्याचे नवे पर्व : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरब देशांना 14 वी भेट

भारत – कुवैत सहकार्याचे नवे पर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरब देशांना 14 वी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्यांचा कुवेतचा दोन दिवसांचा “यशस्वी” दौरा आटोपल्यानंतर मायदेशी रवाना झाले.ज्या दरम्यान दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्य आणि वाढीचे नवे पर्व सुरू करून त्यांचे संबंध धोरणात्मक भागीदारीकडे नेले.भारत आणि कुवेतने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करून ते सामरिक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांच्यादरम्यान रविवारी विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी आणि कुवेतचे अमिर यांनी माहिती तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये संबंधांना चालना देण्यावर भर दिला. अमिर शेख मेशल यांच्याबरोबरची बैठक अतिशय उत्तम झाली असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले. तर, ‘‘या दोन्ही नेत्यांनी भारत-कुवेत संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी विविध मार्ग शोधण्यावर भर दिला,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. यावेळी कुवेतमधील भारतीयांना चांगले आयुष्य मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमिर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादी कारवायांसह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. तसेच दहशतवादविरोधी सहकार्य वाढविण्यावर भर दिला. पंतप्रधान मोदी यांचे कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी युवराज शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांचीही भेट घेतली.
भारत आणि मध्य पूर्व देश ऊर्जा आणि वायूसह अनेक प्रकारच्या व्यवसायांवर अवलंबून आहेत. अरब देश अनेक कारणांनी भारताला महत्त्व देतात. याच कारणामुळे कुवेतच्या या भेटीचा समावेश केला. पंतप्रधान मोदी अरब देशाला भेट देत असल्याची ही चौदावी वेळ आहे याआधी त्यांनी कतार आणि सौदी अरेबियाला दोनदा भेट दिली होती, ओमान आणि बहरीनला एकदा तर यूएईला सात वेळा भेट दिली होती.
मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय काम करतात. एका आकडेवारीनुसार, कुवेतमध्ये भारतीयांची संख्या सुमारे दहा लाख आहे, तर यूएई आणि सौदी अरेबियामध्ये भारतीयांची संख्या अनुक्रमे ३५ लाख आणि २६ लाख आहे. हे भारतीय मोठ्या प्रमाणात देशात मोठ्या प्रमाणात पैसा पाठवतात. याशिवाय भारत आपल्या उर्जेच्या गरजांसाठी अरब देशांवर अवलंबून आहे. हे पाहता भारताने अरब देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
इंदिरा गांधी यांनी १९८१ मध्ये कुवेतला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांनी १९८१ मध्ये कुवेतला भेट दिली होती, तर २०१३ मध्ये कुवेतच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी २००९ साली भारताच्या वतीने कुवेतला भेट दिली होती. भारत आणि कुवेतमधील द्विपक्षीय संबंध सातत्याने दृढ होत आहेत. आणि कोरोनाच्या काळातही दोन्ही देश एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकमेकांना मदत केली. भारताने कुवेतला वैद्यकीय पथक पाठवले होते, तर कुवेतने भारताला द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला होता.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६