नागपूर विभागात ५८० शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या कशा ? बोगस शिक्षक भरतीचे खरे सूत्रधार कोण ?

नागपूर विभागात ५८० शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या कशा ? बोगस शिक्षक भरतीचे खरे सूत्रधार कोण ?
नागपूर/विशेष प्रतिनिधी
शिक्षक म्हणजे समाजाचा कणा…. समाजाचा शिल्पकार…विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु… पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरसह राज्यामध्ये घडलाय…
राज्यात बोगस भरती अनेक वर्षापासून सुरू असताना याची भनक सरकार,शिक्षण विभाग व शिक्षण अधिकाऱ्यांना का लागली नाही..हाच खरा प्रश्न आहे. राज्यात कित्येक वर्षापासून बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या होत आहे. खरंतर शिक्षकांच्या नियुक्त्या २०१२ पासून बंद असताना या शिक्षकांच्या नियुक्ती झाल्याच कशा ? खरे सुत्रधार कोण? या प्रश्नाचे उत्तर देखील याच प्रश्नात दडलेले आहे..बोगस नियुक्तीच्या मागे एक व्यक्ती, एक अधिकारी जबाबदार नसून शिक्षण क्षेत्रातील संपूर्ण यंत्रणाच यासाठी जबाबदार आहे..या महाघोटाळ्यात मंत्रालयातील बडे अधिकारी, संस्थाचालक,शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,वेतन पथकातील सर्व कर्मचारी दोषी असून या दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे..
बोगस शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न आज समोर आला असला तरी या आधी देखील राज्यात बोगस शिक्षकांच्या भरती झाल्या. नागपूर विभागात मृत शिक्षण अधिकाऱ्यांच्या सही शिक्यांचा वापर करून मागील तारखांमध्ये नियुक्त्या दाखविण्यात आल्या.माजी शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम हे सेवानिवृत झाल्यानंतर त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत पावलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या काळातील आवक जावक रजिस्टर देखील गहाळ करण्यात आले आहे. या रजिस्टर शोध सध्या घेतला जात आहे. यासंदर्भात शिक्षक आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. हा घोटाळा झाल्यानंतर विधान सभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर देखील त्याचे पुढे काय झाले? किती अधिकाऱ्यांची चौकशी झाली? समिती नेमण्यात आली का? हा प्रकार घडल्यानंतर लगेच कडक कारवाई,चौकशी झाली असती तर पुढील बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या नत्या .
या बोगस नियुक्ती प्रकरणानंतर नागपूर विभागातच ५८० शिक्षकांच्या बोगस नियुक्ती झाल्याची बातमी झळकली.शिक्षकांच्या नियुक्त्या २०१२ पासून बंद असताना नागपूर विभागात ५८० शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या कशा? बोगस नियुक्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
नागपूर शिक्षण विभागातून मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडीच्या आधारे अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पात्र ठरवून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.शिक्षण उपसचिवांच्या चौकशी अहवालानुसार नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून सुमारे ५८० बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रकरणात वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या आधारे हा गैरव्यवहार उघडकीस आला. शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानंतर कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक संघटनांनी वेतन अधीक्षका विरुद्धअनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांनी मुख्याध्यापकांना चुकीच्या सूचना दिल्याने वारंवार पगार बिल बदलावे लागले. यामुळे शिक्षकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. शिक्षक संघटनांनी त्यांच्याकडून वेतन पथक अधीक्षकाचा कार्यभार काढण्याची मागणी केली होती. तेव्हाच कारवाई झाली असती तरी निश्चितच अशा बोगस नियुक्तांना आळा बसता आला असता.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची एवढी मजल वाढली आहे की बोगस कागदपत्रांच्या आधारे देखील शिक्षकांच्या बोगस नियुक्त केलेल्या आहेत.
कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगनमताने थेट मुख्याध्यापक पद पटकावल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक देखील करण्यात आली आहे.
बोगस नियुक्तीच्या मागे फार मोठे रॅकेट आहे.यात या विभागातील मंत्रालयापासून तर संस्थाचालकांपर्यत सर्वच मिळालेले आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये हजारोंच्या संख्येत बोगस नियुक्त झालेल्या असून अजून पर्यंत या घोटाळ्यावर फारशी कडक कारवाई झाली नाही.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. मात्र थातूरमातूर चोकशी झाली.कित्येक शिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले..काही जगाचा निरोप घेतला..मात्र अजून बोगस भरतीचा फास प्रशासकीय चौकशीत अडकून पडला आहे..जोपर्यंत चौकशी शासकीय स्तरावर होत राहील तोपर्यंत हा प्रकार असाच सुरू राहणार आहे.. बोगस भरतीच्या परदा पाश करायचा असेल तर एसआयटी नेमण्याशिवाय गत्यंतर नाही . एसआयटी नेमून मंत्रालय पासून तर शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,वेतन पथकातील सर्व धिकारी व संस्था चालकांची चौकशी होणे आवश्यक आहे.तरच बोगस शिक्षक भरतीचे वास्तव पुढे येईल..पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीने स्वतःहून दखल घेतली आहे.
शिक्षक भरतीमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय आहे. शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती प्रकरणात मनी लाँडरिंग झाल्याने या प्रकरणाची ‘ईडी’ने स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींसह घोटाळ्यातील अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.याच धर्तीवर राज्यात एस आय टी मार्फत चौकशी व्हावी .सत्य समोर येईलच.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
————