शेतमजुरांच्या शोषणातून भांडवलशाही नांदते – विजय जावंधिया- ‘कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार सोहोळा
शेतमजुरांच्या शोषणातून भांडवलशाही नांदते – विजय जावंधिया ‘कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार सोहोळा
नागपूर/E T News
मी कधीच गरिबी पाहिली नव्हती. पहिल्यांदा शेती करताना लक्षात आले की शेतकऱ्यांना उत्पन्नातून जो काही नफा होतो त्यातील बहुतांश हा मजुरांना दिलेल्या अल्प पैशामुळे असतो. शेतमालाला कितीही भाव मिळाला तरी मजुरांच्या मजुरीत वाढ होत नाही. त्यांच्या शोषणातूनच भाडवलशाही नांदत असल्याचा घणाघात कृषी अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जावंधिया यांनी केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्नेही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक दुर्गादास रक्षक यांच्या नावाने दिला जाणारा यंदाचा ‘कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार’ प्रतिष्ठानतर्फे विजय जावंधिया यांना रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि आजच्या स्थितीवर भाष्य केले. दाभा येथील सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते जावंधिया यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ फिरदोस मिर्झा होते. ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे यावेळी उपस्थित होते.
जावंधिया म्हणाले, पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांची मजुरी वाढण्यासाठी मी लढत आहे. पण अद्याप मला त्याचे समाधान सापडले नाही. कारण याचे मूळ भांडवलशाही व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतमालाचे भाव वधारले की आम्हाला दुःख होत राहणार. आजही आपल्या मालाचे भाव हे अमेरिकेच्या तेजी-मंदीवर ठरतात. असे असेच तर मग आपल्या सरकारची गरजच काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी याचे उत्तर ग्रामगीतेत दिल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्ञानेश्वर रक्षक यांनी पुरस्कारामागील भूमिका विषद केली. फिरदोस मिर्झा यांनी अध्यक्षीय भाषणात हा पुरस्कार जावंधिया यांना मिळाल्याने या पुरस्काराचाच सन्मान झाल्याचे मत व्यक्त केले. सोबतच आजच्या शेतकऱ्यांचे वास्तवही त्यांनी भाषणात मांडले. इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंतरशाखीय विद्याशाखेचे प्रमुख डॉ. प्रशांत कडू यावेळी उपस्थित होते. रवी मानव यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. संचालक मृण्मयी रक्षक यांनी केले. आभार छाया रक्षक यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गुरुदेव सेवक उपस्थित होते.
फोटो ओळी ः विजय जावंधिया यांचा सपत्निक सत्कार करताना प्रा. शरद पाटील, फिरदोस मिर्झा, विकास झाडे, ज्ञानेश्वर रक्षक.