रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात : प्रवासी महासंघाचे निवेदन
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात : प्रवासी महासंघाचे निवेदन
नागपूर/E T News
नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर एका माथेफिरूने झोपलेल्या प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू होणे, ही घटना रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे द्योतक आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा याची जबाबदारी रेल्वे अधिकारी व पोलिसांची आहे. फ्लॅटफॉर्म तिकिटाशिवाय भिकारी, गाडीचे एजन्ट, रिक्षाचालक, मानसिक रोगी आणि विक्रेते यांचा स्टेशनवरील मनसोक्त वावर कसा असतो, असे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार यांनी रेल्वे प्रबंधक व रेल्वे लोह मार्गचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांना दिले आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बिपिन मजुमदार उपस्थित होते.
मानसिक रोगी आणि भिकारी आदी लोकांसाठी बेघर शेल्टर होम, मानसिक उपचार शेल्टर आणि महिला व बाल कल्याण विभागातर्फे सोईसुविधांशी रेल्वे विभागाचा संबंध असणे आवश्यक आहे. रेल्वेत प्रवाशांच्या तिकिटांची तपासणीसाठी टीटी असताना, रेल्वे पोलिसही फिरताना आढळतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. नागपूरचे रेल्वेस्टेशन मध्यवर्ती असल्याने चारही दिशेने येथे गाड्या आवागमन करतात. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षेची नैतिक जबाबदारी कोणीतरी घेणे आवश्यक आहे.
रेल्वे स्थानकावर राज्य सरकारच्या लोहमार्ग पोलिसांकडे कायदा, सुव्यवस्था आणि रेल्वे सुरक्षा दल पोलिसांकडे मालमत्ता सुरक्षेची जबाबदारी आहे, याकडेही प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार यांनी संबंधितांचे लक्ष वेधले आहे.