भूमाफियांवर नऊ प्रकरणात गुन्हे दाखल
नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये शहरात भूमाफिया
सक्रीय झाले असून त्यांच्या माध्यमातून जमिनी बळकावणे, अतिक्रमण करणे आणि बनावट दस्तऐवजांच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्या जाते. अशा फसवणूक होणाऱ्या २७५ नागरिकांनी दस्तऐवजासोबत पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारात भेट देत गाऱ्हाणे मांडले. त्यापैकी ९ तक्रारीवर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.
शहरात सातत्याने भूमाफियांचा वावर वाढल्याने ठाण्यात त्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात येतात. मात्र, अनेकदा त्या तक्रारीवर निश्चित कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण न्यायापासून वंचित राहतात. अशा वंचित नागरिकांसाठी पोलिस आयुक्तांनी सोमवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजतापासून जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलिस (गुन्हे) आयुक्त संजय पाटील, अतिरिक्त पोलिस
आयुक्त (दक्षिण विभाग) शिवाजी राठोड, पोलिस
उपायुक्त (गुन्हे) निमित गोयल यांच्यासह सर्व शाखेच्या
परिमंडळातील उपायुक्तांचे वाचक आणि पोलिस
निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते.
जनता दरबारात शहरातील पाचही परिमंडळातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७५ नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यात आल्यात. त्यामध्ये जवळपास ९ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय २१ प्रकरणात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक तक्रारीमध्ये पोलिसांकडून तपास करण्यात आला असल्याची माहिती समोर आली तर काही प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही दिसून आल्याचीही माहिती त्यांनी दिली.