Breaking
ब्रेकिंग

बलुच सेनेची पाकला दहशत : बलुचीस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष

0 1 8 5 2 1

बलुच सेनेची पाकला दहशत

 बलुचीस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष

   एकाच आठवड्यात दोन वेळा दहशतवादी कारवाया करून बीएलए च्या माजीद ब्रिगेडने पाक सेनेला जबरदस्त धक्का देऊन आपला स्वतंत्र लढा तीव्र केल्याचे संकेत दिले आहेत. 

                 ११ मार्च रोजी पाकिस्तानच्या क्वेटावरून पेशावर कडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ला गुडलास व पिस कुनरीच्या डोंगराळ भागात रेल्वे रूळ उडवून हायजॅक केले. या रेल्वेत ४०० चे वर प्रवासी होते, पैकी शंभरचेवर पाक सुरक्षा सैनिक होते, दहशतवाद्यांनी स्त्रिया व मुलांना सोडून दिले, व अन्य च्या मोबदल्यात अटकेत असलेल्या बलुच लिब्रेशन आर्मीच्या दहशतवाद्यांची मुक्तता करण्याची मागणी केली. प्रकरणाच्या अखेरच्या घटनेबाबत पाक आणि बलूच चे वेगवेगळे दावे आहेत. पाकीस्तानने पत्र परिषद घेऊन सर्व दहशतवादी ठार करून प्रवाशांची मुक्तता केल्यांची घोषणा केली आहे. तर बीएलए ने अद्यापही २०० चे वर प्रवासी आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे .

               या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच क्वेटा वरुन तात्फानला जाणाऱ्या सेनेच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या बस वर बी एल ए ने हल्ला केला व यात नव्वद सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलए ने केला तर पाक तर्फे सात सैनिक ठार व २१ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. भारत व अन्य देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तान मध्ये बीएलए, बीएलएफ, टीटीपी, आदी संघटनांनी पाकच्या नाकी नव आणले आहे. या कारवायानी धास्तावलेल्या पाक शासनाने खेळाण्यातील बंदुकीच्या खरेदी विक्री वरही बंदी घातल्याचे वृत्त आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया बद्दल बोलतांना पाकिस्तान नेहमी “हा काश्मीरी जनतेचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आहे ” असे ढोल बडवत असतो, मग बलूची लोकांच्या या घातपाची कारवाया सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आहे असे म्हणण्याची हिंमत पाकिस्तान दाखवेल काय ? 

          बलुचिस्तानात आज बलुचिस्तानच्या मुक्तीसाठी, बलोच लिबरेशन फ्रंट, बलोच लिबरेशन आर्मी, बलोच रिपब्लिकन गार्ड, बलोच लिबरेशन टायगर, बलोच नॅशनॅलिस्ट आर्मी, युनायटेड बलोच आर्मी, आदी संघटना कार्यरत आहेत.          

  उपेक्षित व पीडीत बलुची जनता         

                     बलुचिस्तान हा पाकचा क्षेत्रफळने सर्वात मोठा पण कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे.याचे क्षेत्रफळ अंदाजे १३४०५१ चौरस मैल असून बहुसंख्य लोकसंख्या बलोच आहे. त्यानंतर पश्तुन, ब्राहुई, हजारास, सिंधी, पंजाबी, मिर्री आहेत. येथे मुख्यत्वे बालोची, उर्दू ,पश्तो व ब्राहूई भाषा बोलली जाते.

                           बलुचिस्तान मधून पाकिस्तानला प्राकृतिक गॅस व तेल मिळते तसेच बलुचिस्तान मध्ये कोळसा सोने तांबे युरेनियम आदी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बरीचशी मदत होते. मात्र यातून बलूचिस्तान ला कहीही मिळत नाही. राजकारण सेना अन्य संस्था, उद्योगधंदे, यात पंजाबी मुसलमानाचे वर्चस्व आहे. बलुचिस्तानातील संसाधनावर सेनेतील अधिकारी धनवान होत आहेत. तर बलोच जनतेच्या वाट्याला अत्याचार, जुलूम महीलावर बलात्कार, पळून नेणे आधी दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे बलुची जनता त्रस्त झाली आहे. 

              सरकारी नोकरीत बलोच जनतेला जागा नाहीत त्यांना गद्दार समजले जाते. त्यातच चीनच्या बिल्ड अँड रोड प्रकल्प तसेच बंदरे विकसित कार्यक्रमामुळे चिन्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आपल्याच भागात आपण दुर्लक्षित व अल्पसंख्याक होण्यासारखी परिस्थिती होत आहे याची भीती बलुची लोकांना आहे. बलुची जनतेची संस्कृती,ओळख ,भाषा पाकीस्तान पेक्षा वेगळी आहे. मात्र आपली हीच ओळख पद्धतशीरपणे मिटविण्याचे षडयंत्र पाक सेना करीत असल्याचा बलूच जनतेचा आरोप असून त्यामुळे त्यांना आता पाकीस्तान पासून अलग व्हावयाचे आहे. या भागात पूरेशा प्रमाणात वाहतूक वीज पाणी यांच्या सुविधा नसल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. 

                 बलूचिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर बंदर पाकने चीनला विकसित करण्यासाठी दिलेले आहे. याच बलुचिस्तान मध्ये चगाई येथे पाकिस्तानचे परमाणु परीक्षण स्थळ आहे.

    बलुचवर पाकचा जबरदस्तीने कब्जा 

  १५ ऑगस्ट १९४७ रोजी कलात स्वतंत्र झाला. जिन्नाने कलातच्या खानला कलातला पाक मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला. खानने ही बाब स्पष्टपणे फेटाळली. एवढेच नव्हे तर जनतेचाही या संभाव्य विलयाला विरोध होता. तेव्हा जीन्नाने १८ मार्च १९४८ रोजी खरान लासबुल व मकरान यांना कलात पासून वेगळे केल्याची घोषणा केली व २७ मार्च १९४८ रोजी कलात वर हल्ला करून खान कडून जबरदस्तीने विलीनकरणाच्या करारावर सह्या घेतल्या. अशा प्रकारे पाकीस्तानने विश्वासघाताने बलुचिस्तान बळकावला.

             बलुच विद्रोह व मुक्ती सेनेचा संघर्ष 

   या जबरदस्तीच्या विलीनकरणा विरुद्ध बलुचिस्तान मध्ये पाक विरुद्ध असंतोष उफाळला व गेल्या ७५ वर्षांपासून याविरुद्ध बलुचिस्तान सतत संघर्ष करीत आहे. कलातच्या खांनचे बंधू अब्दुल करीम यांनी बंडाचे निशाण उभारले त्यांना कैद करण्यात आले. १९५८ मध्ये झालावनचे नबाब नौरोज खान यांनी पाकच्या धोरणाविरुद्ध लढा दिला. मात्र त्यांचेवर देशद्रोहाचा आरोप लावून कैदेत टाकण्यात आले. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला. १९६० मध्ये शेख मुहम्मद बीजराणी मर्री यांचे नेतृत्वात मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. मात्र ६९ मध्ये तो दडपण्यात आला. 

                    ७३ मध्ये पाक शासनाने बलूचिस्तान चे प्रांतीय सरकार बरखास्त करून मार्शल ला लागू केला. त्यामुळे सशस्त्र विद्रोह सुरू झाला. मीर जाफरखान यांनी बलुच पिपल लिबरेशन फ्रंट ची स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या मर्री व मेंगल आदिवासींनी संघर्ष केला. हा शमवण्यासाठी इराणच्या मदतीने त्या भागात बाॅम्ब वर्षाव करण्यात आला. त्यात अंदाजे सात ते आठ हजार बलुच आंदोलक व नागरिक मरण पावले, तर जवळपास ३००० चे आसपास पाक सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बंडावर काबू मिळविण्यात आला. 

              जनरल मुशर्रफचे काळात ्जानेवारी २००५ मधे सुई भागात पेट्रोलियम कंपनीत काम करणाऱ्या एका जोडप्यातील डॉक्टर महिलेवर एका सेनाधिकाऱ्यांनी बलात्कार केला. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बलोच जनतेने मोर्चा काढला. मात्र मुशर्रफ यांनी हा सेनेला बदनाम करण्याचा डाव आहे, असे म्हणून कारवाई नाकारली. त्यामुळे असंतोष वाढला. पाकिस्तानने ७ एप्रिल २००६ रोजी बीएलए ला दहशतवादी संघटना घोषित केले. ऑगस्ट २००६ मध्ये बलुच राज्याचे माजी मंत्री व माजी राज्यपाल राहिलेले व त्यावेळी बीएलए चे नेते असलेल्या नबाब अकबर बुगती यांना त्यांच्या सहकाऱ्यासह पाक सेनेने पहाडी गूहेत ठार केले. त्यामुळे बीएलए मध्ये तीव्र असंतोष झाला व संघटना अधिक एकवटली. 

                  अकबर बुग्ती नंतर बालोच हा संघटनेचा नेता झाला. २००७ मधील एका पाक सेनेच्या कारवाई बालोच ठार झाला. त्यानंतर ब्रह्मदाग बुग्ती हा संघटनेचा नेता झाला. त्याने १५ एप्रिल २००९ रोजी गैरबलोच वर हल्ले करण्याचे आवाहन केले. त्या कारवाईत पाचशे लोक ठार झाले. २०१० मध्ये शैक्षणिक संस्थांनाही लक्ष करण्यात आले. घातपाती कारवयांची तीव्रता हळूहळू वाढू लागली. बलुचिस्तानात असलेल्या व बॅरीस्टर जीनाच्या शेवटच्या दिवसात त्यांनी वास्तव्य केलेली इमारत बीएलए ने नष्ट केली, व त्यावरील पाकिस्तान चा ध्वज काढून त्यावर बलुचीस्तानचा ध्वज फडकविला. पाकने पुन्हा त्यावर कब्जा करून इमारत दुरुस्त केली. 

                             २०१७ मध्ये बिएलए संघटनेत मोठे फेरफार झाले. दोन कमांडर उस्ताद असलम व अकबर जेब यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले. त्यांनी आपला स्वतःचा अलग गट बनविला. मात्र पुढे तोच गटमुख्य बिएलएठरला. असलम च्या काळातच आत्मघातकी पथके निर्माण झाली. २०१८ मधे चीनी दूतावासावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाक सेनेच्या एका कारवाईत असलम ठार झाला. व अकबर जेब नेता झाला. बीएलए कडे आजच्या घटकेस अंदाजे सहा हजाराचे आसपास सैनिक असून अंदाजे शंभर महिलांचे आत्मघातकी पथक आहे. २०२४ पासून संघटनेने आंदोलन अधिक तीव्र केले. २०२४ मध्ये ३०२ हल्ले करून ५८०चे वर लोकांना ठार केले, तर ३७० चे वर लोक जखमी झाले. पूर्वी संघटनेत कबालीचा भरणा असायचा व साधारण जनता असायची मात्र आता स्त्री, पुरुष, मुले ,डॉक्टर ,इंजिनियर, आदी सुशिक्षितांचाही सहभाग मिळू लागल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे पाक सेनेची डोकेदुखी वाढली आहे. आता केवळ आझादी हेच बीएलए ने आपले ध्येय ठरविले आहे ते कितपत साध्य होते हे येणारा काळच ठरवेल.

  भालचंद्र ठोंबरे 

 ९८३४३५०८९५

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे