उद्धवजी आता तरी आत्मचिंतन करा ?

उद्धवजी आता तरी आत्मचिंतन करा ?
नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाविकास आघाडी व महायुती यामध्ये अटीतटीची लढत होईल असे एक्झिट पोल व तज्ञांचे अंदाज असतानाही, लढत एकतर्फी होऊन महायुतीने 280 पैकी 230 जागा मिळवून महाआघाडीचा सुपडा साफ केला. यात भाजपला 132, शिंदे सेनेला 57 व राष्ट्रवादी (अ. प.) 41, तर महाआघाडीतील उबाठाला 20, काँग्रेस 16, व राष्ट्रवादी काँग्रेस( श. प.) 10 अशा जागा मिळून महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले. या पानिपतात मुख्यमंत्री पदाचे असणारे संभाव्य सर्व नेत वाहून गेले पराभूत झाले.
विधानसभेतील हा दारूण पराभव पाहून आघाडीला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे व त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ” कुछ तो गडबड है ” म्हणत ईव्हीएमला दोष देऊन पराभव अमान्य केला व एक प्रकारे जनमताचा अनादर केला.जेव्हा जेव्हा निवडणुकीत विरोधी पक्ष पराभूत होतो तेव्हा तो ईव्हीएम वर दोषारोपण करतो. त्या प्रमाणे याही निवडणुकीत झाले .त्याबद्दल काही विशेष नाही. पण जर खरोखरच निवडणुकीतील ईव्हीएम मध्ये दोष असेल किंवा तो आढळला तर विरोधी पक्षापैकी कोणीही त्याबद्दल योग्य पुरावे देऊन तो सिद्ध करावा जनतेच्या समोर आणावा. जर त्यात दोष सिद्ध झाला तर जनताच योग्य तो न्याय करेलच व ईव्हीएम मधील दोष समोर आणल्याबद्दल त्यांचे कौतुक करेल. व त्यांना जनतेची सहानुभूतीही मिळेल.
निवडणुकीतील ईव्हीएम मधे खरोखरच दोष असेल तर तो उघडकीस येऊन सिद्ध होई पर्यंत उद्धवजी आपण आजपर्यंतच्या यशापयशाबद्दल “आता तरी ” थोडे आत्मचिंतन करावे असे वाटते. “आता तरी “यासाठी म्हणतो, कि जेव्हा एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांनी आपली साथ सोडली तेव्हाही तुम्हाला आत्मचिंतनाची संधी होती.
जरा प्रथम पासूनच सुरुवात करू या का ? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीचा प्रचार करताना अमित शहाने स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असल्याचे जाहीर सभेत सांगत असताना जर आपल्या म्हणण्याप्रमाणे अमित शहा यांनी बंद खोलीत आपल्याशी मुख्यमंत्र्याबाबत आश्वासन दिले होते असे म्हणता तर आपण स्टेजवर त्याचवेळी स्पष्ट का केले नाही व अमित शहांना उघडे पाडण्याची संधी का दवडली ? तुमचे आपसात काय ठरले यातील सत्य असत्यता तुम्हा दोघांनाच माहीती, पण आपण काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विश्वासाने मतदान केले हे मात्र जनतेला पक्के ठाऊक होते त्यांच्या विश्वासाचे काय?
तसेच त्यावेळी निवडणुकीचे निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असे तुमचे प्रवक्ते संजय राऊत यांनी का जाहीर केले होते.? या जाहीर करण्यामागील त्यांचा उद्देश काय होता? किंवा मला (उद्धव ठाकरेंना) मुख्यमंत्रीपद दिले नाही तर मी वेगळा मार्ग अवलंबू शकतो. असा सुप्त पवित्रा तर त्यात नव्हता ना ? अथवा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी तो दबाव आणण्याचा प्रकार तर नव्हता ना ? आणि त्यानंतर आपण शरद पवारांची राष्ट्रवादी व सोनिया गांधींची काँग्रेस यांच्यासोबत युती करून सरकार स्थापन केले.
बरे तर नंतर तुमच्याच सांगण्यानुसार तुम्ही बाळासाहेबांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, असा शब्द दिला होता असे सांगीतले होते. मात्र सत्ता प्राप्ती ची संधी येताच स्वतःच मुख्यमंत्री बनवून आपलाच शब्द फिरवून शिवसैनिकांच्या तोंडाला पाने पुसली, व वडिलांना दिलेला शब्द फिरविला या कृतीला काय म्हणावे? आता मी काय शिवसैनिक नाही का ? असेही तुम्ही म्हणाल.बरोबर आहे.पण ज्या वेळेला एखाद्या पक्षाचा नेता मी माझ्या सैनिकाला एखाद्या पदावर आरुढ करेल असे म्हणतो, त्यावेळेला तो स्वतःला त्या पदा पासून दूर ठेवून बोलतो अशी आमची भोळी बाबडी समजूत आहे. असो. बरे सत्ता प्राप्तीसाठी तुम्ही काँग्रेस सोबत युती करतांना तुम्हाला आपल्या पित्याच्या “काँग्रेस सोबत युती करण्याची वेळ आल्यास मी माझे दुकान बंद करीन” या जाहीरपणे केलेल्या वक्तव्याची आठवण का झाली नाही.? हे पाहून कदाचित बाळासाहेब वरून(स्वर्गातून) म्हणत असतील अरे उद्धवा, बंद खोलीतील वचन तुला आठवते परंतु जाहीर रित्या मी केलेल्या वक्तव्याची तुला आठवण आली नाही का ? तुमची ही कृती भाजप सेनेला सत्ता प्राप्तीसाठी जनतेच्या दिलेल्या जनमताशी, विश्वासघात करणारी व त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी नव्हती का ? यावर आपण भाजपाने ही तर काश्मीर मध्ये मेहबूबाच्या पीडीपीशी युती केली होती असे उदाहरण दिले, व आजही सांगता. बरोबर आहे. भाजपाने काश्मीरात पीडीपीशी युती केली, पण गृहमंत्री पद स्वतःकडे घेऊन काश्मीरातील अंतर्गत परिस्थितीची जाणीव करून घेतली व त्याचा उपयोग पुढे दहशतवाद्याला आळा घालण्यासाठी केला हे पुढील परिस्थितीवरून स्पष्ट होते. तशा प्रकारचे उदाहरण आपण काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर काही फायद्याचे ठरले का? सेनेची सत्ता असूनही अर्थ खाते तत्कालीन एकीकृत राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे असल्याने तुमच्याच सेनेतील अनेकांची विकास कामांसाठी आर्थिक कुचंबणा होत होती हे त्यांच्या त्यानंतरच्या वक्तव्यावरून दिसून आले. मग तुमच्या सत्तेचा फायदा तो काय झाला व कोणाला ?
कालांतराने बाळासाहेबांच्या ध्येय धोरणा नूसार भाजप सेनेची सत्ता यावी यासाठी बाहेर पडलेल्या शिंदे व सहकाऱ्यांनी भाजपा सोबत येऊन सत्ता स्थापन केली. त्यांना तुम्ही गद्दार, मिंध्ये, पन्नास खोके ओके , अशा प्रकारे हिणवले व आजही हिणवता. अहो, बाळासाहेबांच्या ध्येयधोरणानूसार भाजप व शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी बाहेर पडलेल्यांना आपण गद्दार म्हणता, मग तुमच्याच वडिलांच्या ध्येयधोरणाशी विसंगत व विरुद्ध धोरण असलेल्या काँग्रेसशी युती करण्याच्या तुमच्या या कृतीला काय म्हणाल ? यावेळी आर्थिक व्यवहार झाला होता असे संजय राऊत व आपणा सर्वाचे म्हणणे होते व आहे, तर आपण त्यासंबंधी पूरावेगोळा करून निवडणूक आयोगासमोर सिद्ध करून हा सुर्य आणि हा जयद्रथ करण्याची संधी का दवडली.? शिंदे व सहकारी ईडीच्या धाकाने पक्ष सोडून गेले असे तुमचे म्हणणे आहे. समजा, ते एक दोघाच्या बाबत सत्य असेलही, तरी सर्व चाळीसजणांच्याही बाबत हीच शक्यता असणे कमी आहे. त्यावेळेस तुम्ही भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करून तुमच्यापैकी कोणीही मला तुम्ही सत्ता सोडा असे म्हटले असते तर मी ताबडतोब सत्ता सोडली असती असे म्हटले. परंतु तुमच्या सहकाऱ्यापैकी कोणीही तुम्हाला सत्ता सोडा असे म्हटल्याचे ऐकीवात नव्हते व नाही. उलट काँग्रेसची साथ सोडा व माननीय बाळासाहेबांनी भाजपाशी केलेली युती पून्हा करा असेच म्हटले होते ना ? परंतु विषय टाळून तुम्ही त्याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला. खरे तर तेव्हाच तुम्ही आत्मचिंतन करण्याची आवश्यकता होती.असो.
शिंदे व सहकार्यांनी आपली साथ सोडल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला सहानुभूतीचा थोडाफार फायदाच झाला.त्या निवडणुकीत आघाडीच्या बाजूने मुसलमानांच्या एकतर्फा मतदानाचा फार मोठा आधारही मिळाला. आघाडीच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे. बाळासाहेबांच्या काळात दिल्लीचा कोणताही मोठा नेता आल्यास, तो स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मातोश्री वर येत असे. परंतु आता तुम्हालाच स्वतः ईतरांच्या भेटी घेत फिरावे लागते. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून तुम्ही दिल्ली वारी केली, परंतु काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. श्रीराम म्हणणार्यांना मी तर हरामखोर म्हणेन असे म्हणणाराही तुमचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर आला होता.तो खरा असो की खोटा असो परिणाम करून गेला. प्रचार काळात जाहीर कार्यक्रमात मंचावर एक कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा राहुल गांधींना भेट देत असतांना त्यांनी तोंड फिरवले. या त्यांच्या देहबोली वरून त्यांनी प्रतिमा स्वीकारण्यास दिलेला नकार स्पष्ट दिसून येतो. या घटने मुळे शिवाजी महाराजांचा पर्यायाने महाराष्ट्राचा झालेला अपमान आपल्याला तसेच संजय राऊत यांना जाणवला नाही का ? या घटनेचा व राहूल गांधींचा आपण निषेध केला का ? व्हिडिओ खोटा असेल तर तो खोटा आहे, हे तरी जाहीर केले का ?
विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिमांचा पाठिंबा मिळावा म्हणून मुस्लिम उलेमा बोर्डाने दिलेल्या सतरा मागण्यांना सहमती दर्शवणारी कृती हा मतासाठीचा मिंधेपणा दर्शवित नाही काय ? वरील सर्व घटनामुळे हिंदुत्ववादी शिवसैनिक नाराज होऊन तुमच्यापासून दूर गेला असेल तर त्यात त्या मतदारांची चुकी आहे का ? या सर्वाचा परिपाक म्हणून तुमची निवडणुकीतील वाताहात आहे. याचा विचार करा. केवळ ईव्हीएम मशीन वर दोषारोपण करू नका जर त्यामधील दोषांचा पूरावा किंवा भ्रष्टाचाराचा तसेच ५०खोके ओके संबंधी पुरावा असेल तर पुराव्यासह संबंधिताकडे तक्रार करा व संबधीतांना जनतेसमोर उघडे पाडा.त्यामुळे जनतेचा तुम्हाला पाठिंबा व सहानुभूतीही मिळू शकेल.केवळ समजुतीच्या आधारावर असंतोष पसरेल असे करू नका. जाहीर भाषण करताना, हिम्मत असेल तर हे करून दाखवा, ते करून दाखवा, एक तर मी राहीन, नाहीतर तर ते, वगैरे अशा आव्हानात्मक भाषे ऐवजी साधी भाषा वापरा. आदर दिला तरच आदर मिळतो हे लक्षात घ्या. तसेच शिंदे व सहकाऱ्यांना गद्दार, मिंधे म्हणतांना आपल्याही गतकालीन वर्तणूकीचा विचार करा. म्हणूनच म्हणतो की आता तरी एकदा आत्मपरीक्षण करा.
निवडणुकीतील पराभवाच्या चिंतन बैठकीत उपस्थीतांनी व्यक्त केलेल्या ,” एकला चलो रे ” या भावनेचा खरोखरीच विचार करा. आघाडीतून निघून स्वबळावर निवडणूक लढवा. मराठी माणसाच्या हितासाठी नियोजनपूर्वक काही प्रभावी समाजकार्य करा. हिंदुत्वाची कास धरा,व भरकस प्रयत्न कराल, तर पुन्हा एकदा सेनेला भरभराटीचे दिवस येवू शकतील, आणि ते यावेत अशी सर्व हिंदुत्ववाद्याची मनीषा आहे.
सेनेच्या विभाजना पूर्वि शिंदे व सहकाऱ्यांनी केलेली सूचना नाकारल्याने तुमची झालेली हानी नुकसान आठवा, व पुन्हा तसे होवू नये यासाठी नवीन सहकाऱ्यांनी केलेल्या स्वबळावरच्या सुचने वर गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा पून्हा एकदा फूटीचा इतिहास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून म्हणतो आता तरी आत्मपरीक्षण करा.
भालचंद्र ठोंबरे ९८३४३५०८९५