*निराशा हा कोरोनापेक्षाही भयंकर आजार *ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
*निराशा हा कोरोनापेक्षाही भयंकर आजार.
*ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
![]()
*देशाला कमकुवत करण्याचे कारस्थान; सजग राहण्याचा सल्ला
यवतमाळ/E T News
भारत कसा बदलतोय हे तुमच्यासमोर कधी येणार नाही. मीडिया फक्त तुम्हाला निगेटिव्ह नॅरेटिव्हची माहिती देतो. देशाला कमकुवत करण्याकरिता अनेक प्रकारची कारस्थाने सुरू आहेत. हे एक युद्ध आहे, ते तुम्हाला आर्थिक, मानसिक व सामाजिक गुलाम करण्यासाठी चालू आहे. ज्याची आपल्याला कल्पनाच नाही. मात्र याबाबत सजग राहण्याचा सल्ला ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि प्रशिक्षक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
जाजू कॉलेज ऑफ मॅनेजमेंटतर्फे युवा संवाद अंतर्गत ‘भारत महासत्ता निर्मितीत तरुणांचे योगदान’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जाजू कॉलेजचे संचालक अजय जाजू, वाधवाणी कॉलेचचे संचालक जगदीश वाधवाणी आणि व्यावसायिक अतुल शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक होण्याची इच्छा सर्वांचीच असते. परंतु त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नसल्यामुळे आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही. यशस्वी लोकांबाबतही चुकीच्या मार्गाने यश मिळवल्याची जनभावना असते. पण यशाचे शिखर गाठताना त्यांनी घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंतही डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केली. यशस्वीतेचे गमक सांगताना डॉ. निरगुडकर यांनी सायना नेहवालचे उदाहरण दिले. सातत्याने सराव आणि सतत सात वर्षे साखरेची चवही न घेणारी सायना यशाचे शिखर गाठू शकली, ही बाब ध्यानात घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
निराशा हा कोरोनापेक्षाही भयंकर आजार आहे. त्याचे शेवटचे टोक वैफल्यग्रस्तता आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या संधी सोडून देतात, ही बाब स्पष्ट करताना भारत महासत्ता होण्यासाठी रिसोर्सेसची नव्हे तर डोकं ठिकाणावर असण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रस्तावना प्राचार्य रितेश चांडक यांनी तर संचालन प्रा. योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला युवला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
———