राजुरा मुक्तीदिन सोहळा थाटात – आठ सत्कारमुर्तींना राजुरा भूषण सन्मान
* राजुरा मुक्तीदिन सोहळा थाटात – आठ सत्कारमुर्तींना राजुरा भूषण सन्मान
* उपेक्षितांना न्याय मिळण्यासाठी किती वाट पहावी लागणार — प्रमोद काळबांडे
राजुरा/E T News (प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
निजामाची राजवट संपून राजुरा एक वर्ष दोन महिण्यांनी उशिरा स्वतंत्र झाला, मात्र राजुरा भागातील उपेक्षित असलेला कोलाम समाज अजूनही दयनिय स्थितीत आहे. त्याला योग्य सोईसुविधा उपलब्ध नाही. त्यांच्या गाव, वाडी, गुढ्याला अद्यापही रस्ता नाही, शुध्द पाणी नाही, आरोग्य सेवा नाही. आर्थीक व शैक्षणिक बाबतीत मागास असलेल्या या कोलांमांची या दयनीय अवस्थेतून कधी मुक्ती होणार, हा मोठा प्रश्न असून सर्व सुजान नागरिकांनी आणि राजुरा क्षेत्रातून बाहेर जाऊन आपल्या कर्तृत्वाने सिध्द झालेल्या नागरिकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उदघाटक म्हणून बोलतांना जेष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे यांनी केले. राजुरा मुक्तीदिन उत्सव समिती द्वारे स्थानिक सम्राट सभागृहात आयोजित राजुरा मुक्तीसंंग्राम दिन समारोहात प्रमोद काळबांडे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ पत्रकार विकास झाडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राजेश लांजेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, प्राचार्य दौलत भोंगळे, प्राचार्य संभाजी वारकड, दिलीप सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात हैद्राबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ.सोनबा साळवे, उच्चशिक्षित डाॅक्टर्स डाॅ.स्वप्निल चिल्लावार, डाॅ.प्रतिमा चव्हाण-राठोड, डाॅ.नूपुर देशपांडे- गुप्ता,डाॅ. शुभम मोंढे, पाॅवर लिफ्टींग सुवर्णपदक विजेते विरेंद्रसिंग भट्टी, 365 दिवस शाळा चालविणारे राजेंद्र परतेकी, आर्या अकादमीचे भीमराव पवार या मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, साडी व पुष्पगुच्छ देऊन परिवारासह भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले विचार व्यक्त करतांना विकास झाडे म्हणाले की, राजुरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी व सिमेंट कारखाने आहेत. मात्र जमीनीचा मोबदला, नौकरी याबाबत भुमीपुत्रांवर मोठा अन्याय होतो. प्रदुषणाने तर येथे मोठ्या प्रमाणात रोगराईला आमंत्रण दिले आहे. या प्रदुषणाच्या प्रश्नावर आता नागरिकांनी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत विकास झाडे यांनी मांडले. ॲड.वामनराव चटप यांनी या सत्कारमुर्तींनी जन्मगावाशी आणि समाजासोबत बांधिलकी स्विकारीत कार्य करण्याचे आवाहन केले. जीवनाच्या परिक्षेत सर्व सत्कारमुर्ती प्राविण्याने पास झाले असून त्यांच्या संघर्षाचा आदर्श घेऊन या भागातील युवक व विद्यार्थी आपल्या जीवनाला आकार देऊन प्रगती साधतील, असाही विश्वास ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सत्कारमुर्ती डाॅ.सोनबा साळवे, डाॅ.स्वप्निल चिल्लावार, डाॅ.प्रतिमा चव्हाण-राठोड, डाॅ.नुपूर देशपांडे-गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन आनंद चलाख, प्रा.विजय आकनुरवार, कैलास उराडे, मोहनदास मेश्राम, प्रा.सुनिता जमदाडे, अनुष्का रैच, लता कुळमेथे, स्वरूपा झंवर यांनी केले. सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.डाॅ. विशाल मालेकर, संचालन ॲड.मेघा धोटे व प्रा.डाॅ.अर्चना जुनघरे आणि आभारप्रदर्शन संयोजक अनिल बाळसराफ यांनी केले. कार्यक्रमात आरोही संगीत विद्यालयाच्या अल्का सदावर्ते व चमूने स्वागतगीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला प्रा.डाॅ.हेमचंद दुधगवळी, पांडूरंग चन्ने, सुदाम राठोड, मिलींद देशकर, डाॅ.किशोर कवठे,संदीप कोंडेकर, गणेश बेले, बि.यु.बोर्डेवार, स्वतंत्रकुमार शुक्ला, अंजय्या कनकम,बाळकृष्ण गुम्मीद,मधुकर विधाते,अनमोल बोरकर,दिपक शर्मा, सुरेश साळवे, बंडू मेश्राम,मुखरू सेलोटे,संतोष कुंदोजवार, वामन पुरटकर, महेश रेगुंडवार, जयश्री मंगरूळकर, वीणा देशकर,रचना देवगडे,रूपाली वरवाडे,सुनिता टीपले,रेखा रागिट, कविता पचारे,करूणा गावंडे,अश्वीनी वाटेकर,निर्मला बांगडे यांचेसह मोठ्या संख्येने गणमान्य नागरीक व महिला उपस्थित होत्या.