आदिवासी ( गोंड ) समाजातील पहिले नेत्रदान व देहदान
आदिवासी ( गोंड ) समाजातील पहिले नेत्रदान व देहदान
तानाबाई नथ्थूजी चौधरी
नागपूर/E T News
सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगती बैडमिंटन ग्रुपचे सदस्य गजाननराव चौधरी यांच्या मातोश्री श्रीमती तानाबाई नथ्थूजी चौधरी,दिघोरी, नागपूर.यांचे दि.२० आक्टोबर ला वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्यात आले.
आपल्या भारतीय समाजात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजातील लोक अंधश्रद्धा व भ्रमिष्ट असल्यामुळे देहदान करीत नाहीत. परंतु ज्या समाजातील लोकांना तथाकथित सुशिक्षित लोक जाणिव पूर्वक दुर्लक्षित करतात. ते आदिवासी बौद्धिक दृष्टिकोनातून किती पुढाकारलेले आहेत याची प्रचिती आज नागपूर शहरात आली.
एकही दिवस शाळेत न गेलेल्या तानाबाई यांनी त्यांच्या जिवंतपणीच मरणोत्तर देहदान-अवयवदान संकल्प पत्र भरून दिले होते.आपल्या आधीच मातेने केलेल्या मरणोत्तर देहदान व नेत्रदानचा संकल्प आज त्यांच्या शहाण्या मुला मुलींनी पूर्ण केला.
सर्व कालबाह्य रूढी परंपरांना मूठमाती देत त्यांनी आपल्या मातोश्रींच्या लोकोत्तर अंतिम इच्छेचा आदर सन्मान केला. नातेवाईकांकडून विरोध झाला. पण या दुखःद परिस्थितीत नातेवाईकांचे मन न दुखविता या परिवारातील लोकांनी वेळेवर आमचे सहकार्य घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले.
शेवटी महात्मे नेत्र पिढी ला नेत्र दान करण्यात आले तसेच त्यांच्या देहाचे शालीनीताई मेघे रूग्णालयात,हिंगणा येथे दान करण्यात आले.
माझ्या दहा वर्षांतील हे प्रकरण एकमेवाद्वितीय ठरले. खूप ऊर्जा आज मला मिळाली. देहदान-अवयवदान चळवळीत काम करण्याची नवी शक्ती प्रदान झाली. या कुटुंबा प्रती मी सदैव ॠणी राहील.
या नेत्रदान, देहदान निमित्ताने त्यांचे रहाते घरी शोकसभा सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रकाश ढगे यांचे अध्यक्षतेखाली शोक घेण्यात आली. या प्रसंगी देहदान चळवळीतील प्रा.सुशिल मेश्राम यांनी सेवादल शिक्षण संस्था,देहदान समिती मेडिकल, नागपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांचे वतीने अनमोल विचार व्यक्त करीत मृताला विनम्र अभिवादन केले.मदन नागपुरे यांनी मरणोत्तर देहदान- नेत्रदानाचे महत्व व वर्तमान काळात आवश्यकता या संदर्भात मनोगत विशद करून नागरिकांनी जास्तीत जास्त मरणोत्तर देहदान व नेत्रदान च्या संकल्प करावा असे आव्हान केले. याप्रसंगी मान. प्रमोद घाडगे,भारत रेहपाडे, प्रा सुरेश नखाते,अजय तितरमारे,संजय तिजारे,अशोक जाधव,अरुण चौधरी,देवदास नंदेश्वर, कीरण केवट, मधुकरराव मते, महादेव मानकर, सुनिल वंजारी ,हितेश गि-हेपुंजे,शेखर चुटे,मनोज चौधरी इ असंख्य मान्यवर उपस्थित होते.