मनपा प्रशासन व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मनपा प्रशासन व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
माजी नगरसेवक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी
नागपूर/विशेष प्रतिनिधी
नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आर्यन पम्प्स अँड एन्व्हायरो सोल्यूशन प्रा.लि. येथे हेल्पर पदावर कार्यरत पवन चंद्रशेखर वरतकर या कर्मचाऱ्याचा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व मलवाहिनी साफ करण्याच्या या कामातील संबंधित कंत्राटदार आर्यन पम्प्स अँड एन्व्हायरो सोल्यूशन कंपनी व नागपूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
पवन चंद्रशेखर वरतकर या कर्मचाऱ्याच्या मृत्यू संदर्भात त्यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला व घडलेल्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करत गरीब मृतकाच्या परिवारावाला न्याय देण्याची मागणी केली.
नागपूर महानगरपालिका अंतर्गत आर्यन पम्प्स अँड एन्व्हायरो सोल्यूशन प्रा.लि. ही कंत्राटदार कंपनी मलजल वाहिनी साफ करण्याचे कार्य करते. मलजल साफ केल्यानंतर शहर क्षेत्रात दूर टाकी रिकामी केली जाते. या वाहनावर हेल्पर पदावर पवन वरतकर कार्यरत होता. दि. २५ ऑक्टोबर ला नागपूर महानगरपालिका क्षेत्राबाहेर वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरोडी येथील एफएलडी हॉटेल जवळून पवन वरतकर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिघोरी येथील यश हॉस्पिटलमध्ये आणले. हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना भरती केले. मात्र आता हॉस्पिटल प्रशासन पवन वरतकरचा हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगत आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका प्रशासन, आर्या कंपनी सोबतच यश हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका देखील संशयास्पद आहे. ज़र मृतक पवन हॉस्पिटल मध्ये भरती करण्यापूर्वी मरण पावल्याची बतावणी हॉस्पिटल प्रशासन करत आहे, तर त्याला कोणाच्या सांगण्यावरून व कसे भर्ती करून घेतले ? असा प्रश्न उपस्थित करत हॉस्पिटल प्रशासनाची देखील सखोल चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे.
नागपूर महानगरपालिकेचा आर्या कंपनीसोबत करार झाला त्यात त्यांनी मल टाकी शहर क्षेत्राबाहेर रिकामी करण्याचे नमूद केले आहे का ? किंवा कोणत्या पद्धतीच्या अटी शर्थींवर करारनामा मनपा प्रशासनाने सही केला ?, कोणत्या अधिकार्याने तो सही केला ? असे प्रश्न उपस्थित करत कंपनीने कुणाच्या सांगण्यावरून शहर हद्दीबाहेर तरोडी येथे टाकी रिकामी केली. त्यांना महानगरपालिका प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय आहे. महत्वाचे म्हणजे मनपा आणि आर्या कंपनी यांच्याकडून संगनमताने सुरु असलेल्या या प्रतापात सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ होतो आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार, असे सर्व प्रश्न करीत ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी या सर्व प्रशांच्या अनुषंगाने पवन वरतकर च्या मृत्यूची सखोल चौकशी करणे आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी नोकरी देण्यासह तो परिवारात एकटा कमावता असल्याने त्याच्या परिवाराला भराव आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
