योगगुरू विठ्ठलराव जिभकाटे यांचा योग प्रसाराचा 75 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास आजही सुरूच !

योगगुरू विठ्ठलराव जिभकाटे यांचा योग प्रसाराचा 75 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास आजही सुरूच !
पत्रकारितेत विविध विषयावर मी लिखाण केलेच आहे, त्यातील मुलाखती घेणे हा माझा आवडता छंद. दिनमानानुसार मी त्या त्या विषयावर लिहीत असताना संबंधित व्यक्तींच्या मुलाखतीही घेतो. ४० वर्षे न्यूज प्रिंटमध्ये पत्रकारिता केल्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक्स मीडियाकडे वळलो आहे. परंतु या 40 वर्षातील मी घेतलेली विठ्ठलराव गुरुजींची मुलाखत ही लक्षात राहण्याजोगी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योगतज्ञ विठ्ठलराव जिभकाटे यांची मुलाखत घेण्याच्या योग आला. विठ्ठलरावांच्या समोर मी मुलाखत घ्यायला बसलो, परंतु नंतर मला कळले की त्यांना अजिबात ऐकायला येत नाही. मी विचारलेले प्रश्न त्यांना ऐकू गेले नाही तर ते त्याचे उत्तर कसे देणार, असा मला प्रश्न पडला. अशातच त्यांचे सुपुत्र अरविंदजी त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी मला एक डिजिटल पाटी दिली. यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की मुलाखत कशी घेतली असावी.
मी योगगुरू विठ्ठलराव गुरुजींना लहानपणापासून बघत आलो आहे. कारण विठ्ठलराव त्यावेळेस म्हणजे 70 च्या दशकात शाळेमध्ये जाऊन योगाचा प्रचार प्रसार करायचे. त्यावेळेस ते आमच्याही शाळेत आले होते. त्यांनी आमच्या वर्गात योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखवली. ती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली, त्याचा अर्थ समजावून सांगितला. त्यांनी त्यावेळेस योगासनांचे चित्र असलेला एक पत्रकही विद्यार्थ्यांना दिलेला होता, तो आजही माझ्याकडे सुरक्षित आहे. ७० च्या दशकात बघितलेले विठ्ठलराव आणि २०२५ साली बघितलेले विठ्ठलराव यात मला काहीच फरक जाणवला नाही, त्यांची शरीरयष्टी आजही तशीच मजबूत. फरक तो एवढाच की त्यांना आज ऐकायला येत नाही. त्यांचे डोळे मात्र आजही तीक्ष्ण आहेत. ते चष्मा वापरत नाही.
कृषी खात्यात कारकून पदावर नोकरीवर असताना १९७० मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांची योगतज्ज्ञ म्हणून दखल घेतली. योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी त्यांच्यासाठी एक विशेष पद निर्माण केले. याच पदावरून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि वसाहतींमध्ये योगाचा प्रचार केला. त्या काळात आजच्यासारखे सोशल मीडिया सारखे माध्यम नव्हते.
विठ्ठलरावांच्या वेळी वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि पुस्तके हेच माध्यम होते, ज्यांच्या मदतीने त्यांनी योगाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवले. योगाचा प्रचार प्रसार करीत असताना त्यांना आजवर शासनामार्फत व अनेक संस्था, संघटना मार्फत अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. पुरस्कारांसोबत धनराशी ही दिली गेली. परंतु त्या धनराशीचा उपयोग त्यांनी स्वतःच्या प्रपंचाकरिता केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यांनी 51 हजार रुपयांची देणगी दिली. ती यासाठी की योगामध्ये पीएच.डी. करणाऱ्यांना पुरस्कार स्वरूपात देण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वप्रथम 25 हजार रुपयांचा रोख पुरस्कार दिला. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने त्यांना 51 हजार रुपयांचा रोख पुरस्कार दिला, अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेले आहेत, आजही त्यांच्या 97 व्या वर्षातही त्यांचा मानसन्मान होतच आहे.
श्री विठ्ठलराव जिभकाटे यांनी केवळ स्वतःचेच शिक्षण वयाच्या उशिरा पूर्ण केले नाही, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. घरात आलेल्या प्रत्येकाला, सुनांना, मुलांना सर्वांना त्यांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
“शिका, पुढे जा, खूप पुढे जा,” हा त्यांच्या मार्गदर्शनाचा मूलमंत्र होता. त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मुले, सुना आज पोस्ट ग्रॅज्युएट किंवा त्याहूनही जास्त शिक्षित झाले आहेत. योगाच्या माध्यमातून त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा प्रसार केला. विठ्ठलरावांचा हा शिक्षणाचा वारसा फक्त स्वतःपुरता मर्यादित राहिला नाही तर त्यांनी समाजालाही मार्ग दाखवला.
आज, त्यांच्या कार्याचा गौरव करताना आपण त्यांना केवळ एक योगगुरु म्हणून नव्हे, तर समाजसुधारक म्हणूनही पाहतो. त्यांच्या शिकवणींनी हजारो लोकांना निरोगी जीवनाचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे योग केवळ शारीरिक व्यायाम न राहता जीवनशैली आणि तत्त्वज्ञान बनले आहे.
योगाच्या कठीण आसनांमध्ये प्रावीण्य मिळवल्यानंतर विठ्ठलरावांनी स्वतंत्रपणे योगवर्ग घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे समाजात त्यांची ओळख निर्माण झाली. वयाच्या ७३ व्या वर्षी पीएच.डी. मिळवून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. वयाच्या ९७ व्या वर्षीही ते स्वतः योगाभ्यास करतात आणि इतरांना शिकवतात.
महाराष्ट्रातील एका योगसाधकाचा हा प्रवास, ज्यांनी संपूर्ण जीवन योगविज्ञानाच्या अध्ययन, अध्यापन आणि प्रसारासाठी समर्पित केले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षीही त्यांचे ज्ञान आणि ऊर्जा आजही तितकेच प्रभावी आहेत. ७५ वर्षांच्या अथक सेवेमध्ये त्यांनी योगाच्या माध्यमातून हजारो लोकांचे जीवन समृद्ध केले आहे.
त्यांचा प्रवास बालपणात योगाभ्यासाने सुरू झाला. कालांतराने त्यांनी या प्राचीन विद्येचे सखोल अध्ययन केले आणि त्याला आधुनिक युगातील गरजांसोबत जोडले. त्यांनी केवळ साधना केली नाही तर योगशास्त्राचे गाढे संशोधनही केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५,००० हून अधिक योग वर्ग पार पडले आणि त्यांनी ३५ हून अधिक पुस्तके लिहून योगप्रेमींसाठी अमूल्य ठेवा निर्माण केला.
“वृक्ष स्वतः सावली घेत नाही, पण इतरांना सावली देतो” तसेच विठ्ठलरावांनीही स्वतःच्या साधनेतून, शिक्षणातून आणि मार्गदर्शनातून इतरांचे जीवन प्रकाशमान केले आहे. आज त्यांच्या संस्कारांचा आणि प्रयत्नांचा परिणाम म्हणून त्यांचे कुटुंब शिक्षणात, नोकरीत आणि समाजात आदराचे स्थान मिळवून उभे आहे. या महान योगसाधकाच्या कार्याला वंदन आणि त्यांचा प्रवास पुढेही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच शुभेच्छा !
संतोष लांजेवार, ई टी न्यूज चॅनल, सीताबर्डी, नागपूर