सास्ती येथे वैमनस्यातून 26 वर्षीय तरुणाचा खून : तणावपूर्ण वातावरण : दोन्ही आरोपी फरार

सास्ती येथे वैमनस्यातून 26 वर्षीय तरुणाचा खून
तणावपूर्ण वातावरण : दोन्ही आरोपी फरार
राजुरा-चंद्रपूर/जिल्हा प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील औद्योगिक गाव अशी ओळख असलेल्या सास्ती गावात पूर्व वैमनस्यातून एका तरूणाला आपले प्राण गमवावे लागले. आज दिनांक 21 मार्च रोजी सास्ती गावात दुपारी बारा वाजताचे दरम्यान सास्ती गावातील रामनगर वार्डातील आतिश बापू मोतकू, वय 26 याचेवर दोन युवकांनी शस्त्राने हल्ला केला. त्यात आतिश मोतकू जागीच ठार झाला.
ही घटना सास्ती गावात देशी दारू दुकानाच्या मागे घडली. या घटनेतील मृतक व आरोपी हे दोन्ही सास्ती येथील रामनगर वार्डातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन भावांनी लोखंडी सळईने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत आशिष यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
आशिष आणि रामनगर येथील दोन युवकांत यापूर्वी वाद झाला होता. आज सास्ती येथे आतिश ला गाठून आरोपींनी लोखंडी सळईने हल्ला केला. तेव्हा तो एका व्यक्तीचे घरी लपून बसला. मात्र आरोपींनी खिडकीतून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतिश त्या घरातून बाहेर पळून जात असतांना पुन्हा त्याचा पाठलाग करीत त्याचेवर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक एका गुन्ह्यातून नुकताच जानशमीनावर सुटला होता, अशी माहिती मिळाली.
घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी गेले आणि पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. यावेळी बल्लारपूर व चंद्रपूर येथुन अतिरिक्त पोलिसांना पाचारण केल्याने सास्ती गावाला आज पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. राजुरा ठाणेदार अनिकेत हिरडे, आयपीएस हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान उपजिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांनी सास्ती गावाला भेट दिली. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.
————